Wednesday, November 14, 2012

विसोबा खेचर

-संध्या पेडणेकर
संत चरित्रांमध्ये विसोबांचे नाव विसोबा खेचर कसे पडले याबद्दल एका घटनेचा उल्लेख येतो.
आळंदीत रहाणार्‍या दुष्ट विसोबा ब्राह्मणाला ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाईबद्दल नेहमी द्वेष वाटायचा.
एकदा मुक्ताबाईला मांडे खायची इच्छा झाली.
मांडे बनविण्यासाठी मातीच्या तव्याची गरज होती. ज्ञानेश्वर तवा आणण्यासाठी कुंभाराकडे निघाले.
रस्त्यात त्यांना विसोबा भेटले. ज्ञानेश्वर कुंभाराकडे कशासाठी चालले आहेत हे कळले तेव्हा तेही त्यांच्यासोबत निघाले.
त्यांनी कुंभाराला ज्ञानेश्वरांना तवा देऊ दिला नाही.
दुखी मनाने ज्ञानेश्वर घरी परतले. मुक्ताबाईनं विचारलं, 'भांडं कुठाय?'
ज्ञानेश्वर तिला म्हणाले, 'तू तयारी कर, माझ्या पाठीवर मांडे भाज.'
तवा न मिळाल्याने घरी परतल्यानंतर होणारी भांडणे पाहाण्यासाठी ज्ञानेश्वरांमागोमाग विसोबासुद्धा येऊन लपून उभे होते.
मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे थापले, भाजले हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
हा चमत्कार पाहून विसोबा आमूलाग्र बदलले. पुढे येत त्यांनी ज्ञानेश्वरांचे पाय धरले आणि माफी मागितली.
तवा न मिळण्यामागे विसोबांचं कारस्थान होतं हे  मुक्ताबाईला समजलं. रागानं ती म्हणाली, 'दूर हो खेचरा! आधी तवा मिळू दिला नाहीस आणि आता मांडे बनू देणार नाहीस का?'
ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला शांत केलं. पण तेव्हापासून विसोबा झाले विसोबा खेचर. आजही त्यांना याच नावानं ओळखलं जातं. 

Monday, October 29, 2012

भीती कुणाची?

-संध्या पेडणेकर
एकदा टॉलस्टॉय भल्या पहाटे उठून चर्चमध्ये गेले.
आपण दरवेळी जातो तेव्हा देव भक्तांच्या गर्दीत असतो, आज आपण देवाला एकट्याला भेटू असा विचार त्यांनी केला.
पण ते जेव्हा चर्चमध्ये पोहोचले तेव्हा तेथे आधीच एक माणूस गुडघे टेकून बसला होता आणि देवाच्या मूर्तीबरोबर काहीतरी बोलत होता. तो बोलत असलेले काही शब्द टॉलस्टॉयच्या कानांवर पडले.
तो म्हणत होता, 'देवा मला माफ कर... सांगतानासुद्धा शरमिंधं व्हावं इतकी मी पापे केली आहेत. माफ कर मला...'
टॉलस्टॉयला वाटलं, किती महान व्यक्ती आहे ही. अगदी खुल्या दिलाने देवाकडे आपल्या हातून घडलेल्या पापांसाठी क्षमा मागतेय. पश्चातापानं बहुधा पोळून निघालेला दिसतोय.
तेव्हढ्यात त्या व्यक्तीची नज़र या माणसावर पडली. गोंधळून गेल्यासारखा वाटला तो क्षणभर. मग टॉलस्टॉयना म्हणाला, 'महाशय, देवाशी माझा जो संवाद चालला होता तो आपण ऐकला तर नाही?'
टॉलस्टॉय म्हणाले, 'हो, मला आपलं बोलणं ऐकू आलं आणि खरं सांगतो, धन्य वाटलं मला अगदी. आपल्या अपराधांची कबूली दिलीत आपण, मला आदर वाटतो आपल्याबद्दल.'
तो माणूस म्हणाला, 'ते सगळं ठीक आहे, पण कृपा करून आपण या गोष्टी इतर कुणाला सांगू नका. खरं तर या केवळ माझ्या आणि देवामधल्या गोष्टी. आपण ऐकल्या म्हणता तर ठीक आहे, पण कृपया इतर कुणालाही सांगू नका. आणि सांगितल्या तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा...   '
टॉलस्टॉयनी आश्चर्यानं विचारलं, 'पण आत्ता आपण देवासमोर आपल्या अपराधांबद्दल पश्चाताप व्यक्त करत होतात, आणि आता...'
तो माणूस म्हणाला, 'त्या केवळ माझ्या आणि देवामधल्या गोष्टी होत्या. जगासाठी नव्हत्या त्या.'
टॉलस्टॉयना वाटलं, असं आहे तर, म्हणजे लोक  इतर लोकांनाच घाबरतात, देवाला नाही!
---

Thursday, October 25, 2012

स्वतःपासून सुरवात


-संध्या पेडणेकर
युद्धाचे दिवस. राजाचे सैनिक सगळीकडे विखुरलेले होते. ते ज्या गावात जात त्या गावातल्या लोकांना इच्छा असो वा नसो त्यांच्या राहाण्या-खाण्याची व्यवस्था करावी लागे. लोकांमध्ये देशभक्तीची उणीव होती असे नव्हे. सैनिकांचे वागणे, त्यांचा क्रूरपणा आणि अकारण नासधूस करण्याची सवय यामुळे लोक त्यांच्यापासून चार हात लांब रहाणेच पसंत करीत असत.
एके दिवशी सैनिकांच्या अधिकार्यानं एका शेतकर्‍याला विचारलं, ‘गावात कुणाच्या शेतात पीक चांगलं उभं आहे ते सांग. आता आठवडाभरापर्यंत आमचा येथेच मुक्काम रहाणार आहे. आम्हाला आपल्या खाण्या-पिण्याची आणि घोड्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करायचीय.’
शेतकरी पेचात पडला. सांगितले नाही तर सैनिकांच्या तावडीत सापडणार, ते आपल्याला यथेच्छ बुकलणार आणि सांगायचं तर ज्या शेतकर्‍याबद्दल सांगायचं त्याच्या संपूर्ण शेतावर सैनिकांचा नांगर फिरणार. वर्षभर मग त्याच्या घरातले लोक काय खाणार? त्यांच्या इतर गरजा कशा पूर्ण होणार?
चालता चालता त्याने मनाशी एक निर्णय घेतला.
गावकर्‍यांच्या शेतांतून ते फिरत होते. सैनिकांनी बर्‍याच शेतांकडे बोट दाखवून तेथील पीक चांगले असल्याचं सांगितलं पण दरवेळी आपल्याला इथली जास्त माहिती असल्याचं सांगत त्या शेतकर्‍यानं त्यांना पुढे नेलं. दरवेळी तो म्हणायचा, 'यापेक्षा चांगलं पीक कुठे उभं आहे ते मला ठाऊक आहे, पुढे चला.'
शेवटी सगळे एका शेतापाशी पोहोचले. समोर उभ्या पिकाकडे बोट दाखवून शेतकरी म्हणाला की, या शेतातलं पीक सर्वात चांगलं आहे.
सैनिक अधिकारी भडकला. म्हणाला, ‘वेड लागलं का रे तुला? यापेक्षा कैक पटींनी चांगल्या पिकांची शेतं आपण मागे टाकून आलो की. असं का केलंस?'
शेतकरी सैनिकांच्या अधिकार्‍याला म्हणाला, 'शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाची किंमत तुम्ही देणार नाही हे मला ठाऊक होतं. अशावेळी मी इतर कुणाचं नुकसान कसं करणार? हे पीकच शेतकर्‍यांची वर्षभराची कमाई. यावरच ते आपल्या संसाराचा गाडा रेटतात. त्यांची ही कमाई मी कशी काय हिरावू देणार? आणि  मी खोटं बोललो नाहीय. हे माझं शेत आहे. माझ्या दृष्टीनं याच शेतातलं पीक सर्वात जास्त चांगलं आहे.'
शेतकर्‍याचं बोलणं ऐकून सैनिक अधिकारी शरमिंधा झाला. त्याने शेतकर्‍याला त्याच्या पिकाची किंमत तर दिलीच, शिवाय, न घाबरता त्याने जी उत्तरे दिली त्यासाठी त्याला बक्षीसही दिले.
---

Friday, October 19, 2012

वैराग्यातील उणीव

-संध्या पेडणेकर
पुराणात राजा भर्तृहरींबद्दल एक कथा आहे. त्यांना वैराग्य आलं तेव्हा त्यांनी आपल्या राज्याचा त्याग केला. त्यावेळी पार्वतीने शंकरासमोर त्यांच्या त्यागाची वाखाणणी केली. पण शंकर म्हणाले, 'त्यांच्या त्यागात उणीवा आहेत.'
पार्वतीनं विचारलं, 'कोणत्या उणीवा?'
शंकर म्हणाले, 'भर्तृहरीनं राज्याचा त्याग भले केला असेल, पण संन्याशाच्या जीवनाची सुरवात करताना त्यांनी काही वस्तू सोबत घेतल्या. राजमहालातून निघताना त्यांनी पाण्याचं भांडं, उशी आणि हवा ढाळण्यासाठी पंखा सोबत घेतला.' यावर पार्वती निरुत्तर झाली.
काही काळानंतर साधनेच्या क्रमात वैराग्याची खोली वाढत गेली हळूहळू या तिन्ही वस्तूंची त्यांना असलेली गरज संपली.  पार्वतीने त्यांच्या वैराग्याबद्दल विचारलं तेव्हाही शंकर म्हणाले, 'अजूनही उणीव आहे.'
पार्वतीनं विचारलं, 'आता कुठली उणीव आहे? वैराग्याबद्दलचे आपले अनुभव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते वैराग्यशतक लिहिताहेत, भिक्षा मागणंही त्यांनी सोडून दिलंय. मिळालं तर खातात, नाही मिळालं तर काही खातही नाहीत.  बराच काळपर्यंत खायला काही मिळालं नाही तर पिंडदानासाठी आलेल्या पिठाच्या भाकर्‍या थापून त्या चितेच्या आगीवर भाजून खातात. अजून त्यांच्या वैराग्यात उणीव आहे असं म्हणता तर ती कोणती ते सांगा.'
ही गोष्ट सांगून समजण्यासारखी नाही हे शंकराच्या लक्षात आलं होतं. ते म्हणाले, चला आपण प्रत्यक्षच पाहू. मग दोघेही वेष पालटून भर्तृहरीसमोर आले. शंकरानं वृद्धाचा आणि पार्वतीनं वृद्धेचा वेष घेतला होता. त्यांनी भर्तृहरीकडे भिक्षा मागितली.
भर्तृहरींना गेले तीन दिवस भिक्षा मिळाली नव्हती. त्यादिवशी त्यांना थोडं पीठ मिळालं होतं त्याच्या भाकर्‍या ते भाजत होते. त्यांनी या वृद्ध जोडप्याला बसवलं आणि सार्‍या भाकर्‍या त्यांना दिल्या.
यावर त्यांच्या वैराग्याच्या पूर्ततेबद्दल पार्वतीने नजरेनंच शंकराला विचारलं.
त्यावर शंकर नजरेनंच उत्तरले, 'नाही'.
वृद्ध दांपत्यामध्ये चाललेली नजरेच्या खुणांची देवघेव भर्तृहरींच्या नजरेतून निसटली नव्हती. त्यांनी कुतूहलानं विचारलं तेव्हा पार्वतीनं केलेल्या पृच्छेबद्दल सांगताना शंकर म्हणाले, 'या विचारताहेत की,  यानं सगळ्या भाकर्‍या आपल्याला दिल्या. आता हा काय खाणार? आपण याला काही भाकर्‍या देऊया.'
ते ऐकलं आणि भर्तृहरींचा अहंकार डिवचला गेला. ते म्हणाले, 'आपण मला ओळखत नाही. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा मोह बाळगला नाही तर या चार भाकर्‍यांचा मोह  मी काय बाळगणार? न्या सगळ्या भाकर्‍या, आणि अगदी शांत चित्तानं आपली भूक भागवा. यातच माझा संतोष सामावलेला आहे.'
शंकर काही बोलणार त्याआधी पार्वती म्हणाली, 'आलं माझ्या लक्षात. भर्तृहरीनं लौकीक वस्तूंचा त्याग केला पण त्यांच्या मनात अजूनही यशाची आसक्ती आणि अहंकार ठाण मांडून आहेत. भगवन्, बरोबर आहे आपलं, यांच्या वैराग्यात उणीवा आहेत.'
---

Wednesday, October 10, 2012

जुगाराचा अड्डा आणि स्मशान

-संध्या पेडणेकर
एकदा चीनचे प्रसिद्ध तत्ववेत्ते कन्फ्यूशियस यांना भेटायला एक माणूस आला. तो त्यांना म्हणाला, 'मला तपस्या करायचीय.'
कन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'ठीक आहे. पण मला असं वाटतं की ध्यानधारणा शिकण्याआधी तू दोन ठिकाणांना भेट द्यावीस. असं कर, तू जुगाराच्या अड्यावर जा. तेथे लोक काय करतात ते लक्ष देऊन पाहा. स्वतः काहीही करायचं नाही, फक्त पाहायचं. आणि ते पाहून तुला काय वाटलं ते मला सांगायचं.'
दोन महिन्यांनंतर तो माणूस कन्फ्यूशियसना भेटायला आला. म्हणाला, 'लोक वेडे आहेत.'
कन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'ठीक आहे, आता मी साधनेचं दुसरं सूत्र तुला देतो. आता पुढचे दोन महिने तू स्मशानात जाऊन बस. तेथे जळणारी मढी पाहा.'
दोन महिन्यांनंतर तो माणूस पुन्हा परतला. म्हणाला, 'आपण माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. माझे डोळे उघडले. हे जीवन एक मोठा जुगार आहे  आणि त्याचा शेवट स्मशानात होतो, हे मला समजलं.'
कंन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'जीवनाचं रहस्य तू जाणलंस. आता तू ध्यानधारणेच्या अंतर्यात्रेसाठी निघू शकतोस.'
---

Friday, October 5, 2012

जाळं आपलं न् शिकारही स्वतःचीच


-संध्या पेडणेकर
एकदा एक म्हातारा एका खेडेगावातील रस्त्यावरून हळूहळू चालला होता. त्याचा लांब-ढगळ झगा, शुभ्र पांढर्‍या आणि लांबलचक दाढी-मिश्या, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा तिथल्या लहान मुलांना गमतीदार वाटला असावा. एक-एक करत चांगला दहा-बारा मुलांचा घोळका म्हातार्‍याच्या मागे मागे चालू लागला. मुलांमध्ये आणि वानरांमध्ये तसा फारसा फरक नसतो. मुकाट चालतील तर ती मुलं कसली? हळूहळू त्यांचा वात्रटपणा जागा झाला. त्यांनी म्हातार्‍याला हैराण करायला सुरवात केली. शेवटी जेव्हा ते म्हातार्‍यावर रस्त्यावरचे खडे उचलून फेकू लागले तेव्हा म्हातार्‍यानं ठरवलं की खूप झालं.
म्हाताराही बनेल होता. मुलांनी पिच्छा सोडावा म्हणून त्यानं मुलांना एक लोणकढी थाप ठोकली.
मागे वळून त्यानं मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, मी कुठे निघालोय ते तुम्हाला ठाऊक आहे का? अरे बाळांनो, आज आपला राजा सगळ्यांना मेजवानी देतोय. तुम्हाला ठाऊक नाही का? मी असा हळूहळू चालत निगालोय, पोहोचेपर्यंत मेजवानी संपू नये म्हणजे झालं!’
मग जिभल्या चाटत म्हातार्‍यानं मागल्या वेळी राजानं मेजवानीत काय काय पक्वान्नं खाऊ घातली होती त्याचं रसभरीत वर्णन केलं. त्या पक्वान्नांचा सुगंध, तेथील एकूण थाटमाट, मिठाया, सरबतं वगैरेंचं त्यानं केलेलं वर्णन ऐकून मुलांनी त्याचा पिच्छा सोडून तेथून पोबारा केला.
म्हातार्‍यानं सुटकेचा श्वास सोडला आणि तो पुढे निघाला.
वयोमानामुळे तो अगदी हळूहळू चालत होता.
थोडं अंतर चालून गेला असेल-नसेल तो गावातली काही मंडळी लगबगीनं राजमहालाच्या दिशेनं चालल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं सहज विचारलं तेव्हा गावकर्‍यांनी त्याला सांगितलं की राजा मेजवानी देतोय म्हणून आम्ही सगळे त्या मेजवानीत सामील होण्यासाठी निघालो आहेत.
आणखी थोडं पुढे गेल्यावर त्याला आणखी काही लोक राजमहालाच्या दिशेनं जाताना दिसले. राजा खरोखर मेजवानी तर देत नसेल ना? –असा विचार त्या म्हातार्‍याच्या मनात आला.
आणखी थोडं अंतर चालल्यानंतर त्याला राजमहालाकडे निगालेले णखी काही लोक भेटले. ते सगळे मेजवानीत सामील होण्यासाठी निघाले आहेत हेही त्याला समजलं.
म्हातारा बावचळला. त्याला वाटलं, खरंच राजा मेजवानी देत असणार. नाहीतर इतके लोक राजवाड्याकडे का बरं गेले असते? आपणही जाऊन पाहावं. बरेच दिवस झाले पक्वान्नं खाऊन. नसेल मेजवानी देत राजा तरी फार फार तर काय होणार? तर, माझी फेरी फुकट जाणार. आपल्याला असं काय मोठं महत्वाचं काम करायचंय सध्या? यावेळच्या मेजवानीचा काय थाटमाट आहे ते तरी पाहू की!
म्हातार्‍याची पावलं आपसुक राजवाड्याच्या दिशेला वळली.

Saturday, September 29, 2012

जैशी व्यक्ती तैशी सजा!

-संध्या पेडणेकर
एका राज्याच्या तीन अधिकार्‍यांनी राज्यकारभारात मोठा घोटाळा केला.
राजानं तिघांनाही बोलावलं.
त्यांच्यापैकी एकाला राजा म्हणाला, 'मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.'
दुसर्‍या व्यक्तीला राजानं एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
तिसर्‍या व्यक्तीला नगरातून धिंड काढून फटके लगावण्याची आणि वीस वर्षे कारावासाची शिक्षा फर्मावली.
दरबारी गोंधळले. एकाच गुन्ह्यासाठी तीन व्यक्तींना तीन प्रकारची शिक्षा?
त्यांनी बिचकत बिचकत राजाला विचारलं, 'एकाच अपराधासाठी तिघांना तीन प्रकारच्या शिक्षा हे न्यायसंगत नाही.'
राजा त्यांना म्हणाला, 'शिक्षा देताना मी- जशी व्यक्ती तशी शिक्षा -  हेच तत्व समोर ठेवलं होतं. पहिली व्यक्ती अतिशय सज्जन होती. त्याला मी कोणतीही शिक्षा दिली नाही तरी त्यानं घरी गेल्यानंतर आत्महत्या केली. दुसरी व्यक्ती थोड्या जाड चमडीची होती म्हणून तिला मी एक वर्षाची शिक्षा सुनावली.'
एक दरबारी म्हणाला, 'महाराज, तिसर्‍याला मात्र आपण खूपच कठोर शिक्षा दिलीत.'
त्याचं बोलणं ऐकून राजा हसला, म्हणाला, 'कारागृहात जाऊन तुम्ही एकदा त्या व्यक्तीला भेटा. म्हणजे त्याला दिलेल्या शिक्षेचं औचित्य तुमच्या लक्षात येईल.'
काही दरबारी मग त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले. शिक्षा मिळालेल्या आपल्या पूर्व सहकार्‍याला ते भेटले. मिळालेल्या शिक्षेचं त्याच्या चेहर्‍यावर अजिबात वैषम्य नव्हतं. नगरातून धिंड काढल्याचं, कोडे खाल्याचं त्याला  काहीही वाटलं नसावं, कारण तो तिथेही अगदी मजेत होता. भेटायला आलेल्या दरबार्‍यांना तो म्हणाला, 'फक्त वीस वर्षांचीच तर बाब आहे! शिवाय मी इतकं कमावून ठेवलंय की माझ्या सात पिढ्यांनी जरी हात-पाय हालवले नाहीत तरी काही एक कमी पडणार नाही. आणि, या कारागृहातही तसा कुणाचा त्रास नाहीच. आरामात आहे मी अगदी. '
दरबार्‍यांनी विचारलं, 'शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, सगळ्यांसमोर तुम्हाला कोडे मारले गेले, सगळीकडे तुमची बदनामी झाली...'
त्याला मध्येच अडवत ती व्यक्ती म्हणाली,'बदनामी झाली म्हणून काय झालं? शेवटी मला प्रसिद्धीच मिळाली ना? आज शहरभर माझ्याबद्दलच चर्चा करत असतील लोक!'
राजानं योग्य निवाडा केला होता हे दरबार्‍यांना पटलं.
---

Friday, September 14, 2012

कबीराचे गुरु

-संध्या पेडणेकर
कबीरानं गंगेच्या घाटावर स्वामी रामानंदांकडून दीक्षा मिळवल्याबद्दल सांगितलं जातं. सकाळच्या वेळी ज्या वाटेनं स्वामी रामानंद गंगास्नानासाठी जात असत त्या वाटेवर निजून कबीरानं दीक्षा मिळविली होती. चुकून रामानंदांचा पाय कबीराला लागला आणि  त्यांच्या तोंडून 'राम, राम' हे शब्द निघाले. अशा प्रकारे,  नकळत कबीराला रामानंदांकडून दीक्षा मिळाली होती.
दीक्षा घेतल्यानंतर कबीराला ज्ञानप्राप्ती झाली. त्यांच्या वाणीत विशेष गोडवा आला. गंगेकाठी ते जेव्हा कीर्तन करत तेव्हा लोक आपसूक त्यांच्या कीर्तनाला येऊन बसत. त्यांच्या कीर्तनाला गर्दी वाढू लागली.
हे पाहून काशीचे पंडित नाराज झाले. त्यांच्यापैकी कित्येकजणांनी वेदाभ्यास केलेला होता, पण त्यांचं कीर्तन ऐकायला कुणीही येत नसे. त्यामुळे कबीरानं केलेल्या कीर्तनाला लोक जमलेले पाहून त्यांना कबीराचा हेवा वाटू लगला.
पंडितांनी मग कबीरांना समजावण्याचा प्रयत्न केला, 'तू गृहस्थ आहेस, मुलं-बाळंही आहेत. शिवाय तुझा कुणी गुरूही नाही. म्हणून तू कथा सांगू नयेस.'
कबीर म्हणाले, 'माझे कुणी गुरू नाहीत असं आपलं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे. मी ही विद्या गुरूकडूनच शिकलो. गुरूकृपेविना ज्ञानप्राप्ती होणं शक्य तरी आहे का?'
कबीराचं म्हणणं ऐकून पंडित मंडळींना आश्चर्य वाटलं. त्यांनी कबीरांना त्यांच्या गुरूचं नाव विचारलं. कबीरांनी सांगितलं की स्वामी रामानंद माझे गुरू आहेत.
पंडित मग स्वामी रामानंदांकडे गेले. स्वामी रामानंदांकडे त्यांनी विचारणा केली की, आपण वैष्णव संप्रदायाचे कट्टर समर्थक आहात. कबीराचा धर्म कोणता हे सुद्धा कुणाला धड ठावूक नाही. त्याला आपण दीक्षा दिलीत हे कसं काय? हे आचरण धर्माविरुद्ध नव्हे काय?
रामानंदांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यांनी विचारलं, 'कोण कबीर? त्याला मी दीक्षा दिली? कधी?'
संपूर्ण काशी शहरात मग- 'गुरू खरं बोलतोय की शिष्य खरं बोलतोय?' याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. वृत्त रामानंदांच्या कानावर आलं आणि ते तापले. त्यांनी कबीराला बोलावलं न् विचारलं, 'तुझे गुरू कोण?'
कबीरानं सांगितलं, 'आपणच माझे गुरू!'
स्वामी रामानंदांनी हे ऐकलं आणि पायीची खडाऊ हातात घेऊन कबीराच्या डोक्यावर हाणली. त्यांना मारता मारता ते बोलू लागले, 'मी तुला दीक्षा दिली का? मला खोटं पाडतोस? राम राम राम!....'
कबीरानं स्वामी रामानंदांच्या पायांवर लोटांगण घातलं. म्हणाला, 'गुरुदेव, गंगेच्या काठी आपण दिलेली दीक्षा जर खोटी तर मग आत्ता आपण देत असलेली दीक्षा तरी खरी आहे ना? आपले हात माझ्या डोक्यावर आशिर्वादांची बरसात करत आहेत. आपल्या मुखातून माझ्यासाठी रामनामाचा मंत्र मला मिळत आहे.'
कबीराचं बोलणं ऐकून रामानंदांना संतोष झाला. कबीराला त्यांनी आपला शिष्य मानलं.
----

Monday, September 10, 2012

भाग्याची हाक ओळखा


-संध्या पेडणेकर
सूफी संत हुजबिरी नेहमी म्हणत, माणूस हाती आलेल्या संधी दवडत असतो आणि मग उगीच भाग्याला दोष लावत बसतो.
एकदा एक माणूस त्यांना म्हणाला, मी नाही मानत असं. आता माझंच उदाहरण घ्या ना. जन्म गेला माझा, भाग्याच्या हाकेकडे कधीपासून कान लावून बसलोय मी. भाग्यानं जर संधी दिली असती तर मी ती कधीही दवडली नसती, पण आमचं कुठलं आलंय एवढं भाग्य.
हुजबिरी त्याला म्हणाले, असं आहे गड्या, मी आता जरा नदीच्या पलीकडच्या गावी चाललोय. संध्याकाळी नदीकाठच्या पारावर बसलेला असेन मी. तू ये तिकडे, आपण या विषयावर बोलू.  
संध्याकाळी भेटण्याचं कबूल करून तो माणूस निघून गेला. हुजबिरींनी मग आपल्या शिष्यांना त्याच्या येण्याच्या मार्गावर सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं ठेवायला आणि स्वतः आसपास रहायला सांगितलं.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी तो माणूस पुलावरून चालत पलीकडे नदीकाठच्या झाडाखाली लोकांशी बोलत बसलेल्या हुजबिरींना भेटायला आला. गंमत अशी की पुलावर जिथे मडकं ठेवलेलं होतं त्याआधी दहा पावलं त्यानं चक्क डोळे मिटून घेतले. पुलावरचं उरलेलं अंतर त्यानं डोळे बंद ठेवूनच ओलांडलं. हे पाहून तिथे उभे असलेले इतर लोकही चकित झाले. सगळ्यांना वाटलं, कमाल झाली. अगदी त्या मडक्याजवळ आल्यावरच याला नेमकी डोळे बंद करायची बुद्धी कशी सुचली?
तो माणूस हुजबिरींसमोर आला तेव्हा त्याच्या मागोमाग सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं ते मडकं घेऊन हुजबिरींचे शिष्यही आले.
हुजबिरींनी त्या माणसाला विचारलं, तू असे चालता चालता अचानक डोळे का बंद केलेस?
तो माणूस म्हणाला, तसं खास काही नाही, मला वाटलं, डोळे बंद करून पुलावरून चालताना कसं वाटतं ते जरा पाहावं, म्हणून...
हुजबिरी त्याला म्हणाले, सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं हे मडकं पाहिलंस का? केवळ तुला मिळावं म्हणून मी ते तुझ्या रस्त्यात ठेवलं होतं. उचललं असतंस तर तुझ्या सगळ्या आर्थिक विवंचना मिटल्या असत्या. पण माझं मन मात्र साशंकच होतं. जन्मभर चालून आलेल्या संधी तू दवडल्यास तर आता या संधीचं तू काय सोनं करणार असं वाटलं होतं मला. आणि तू तेच सिद्ध केलंस. काय तर म्हणे, डोळे बंद करून चालून पाहावं!

Monday, August 27, 2012

संवेदनशीलता हवीच

-संध्या पेडणेकर 
फार मोठं नव्हतं, पण समीरचा उदरनिर्वाह त्याच्या छोट्याश्या गॅरेजच्या कमाईवरच चालायचं. लहानपणापासून समीरला वेगाचं भयंकर वेड.
थोडा हात चालला तेव्हा त्यानं एक मस्तपैकी गाडी खरेदी केली स्वतःसाठी. अगदी वार्‍याबरोबर शर्यत लावायची त्याची गाडी. आपल्या गाडीची तो खूप काळजी घेत असे.
समीरचा लहानपणीचा एक मित्र रघू एकदा अचानक त्याला भेटायला आला. समीरच्या गाडीचं त्यालाही खूप कौतुक वाटलं, पण राहून राहून त्या गाडीला पडलेली छोटीशी खोक आणि तेथील उडालेला रंग त्याला बुचकळ्यात टाकत होता. शेवटी त्यानं समीरला विचारलंच. म्हणाला, 'समीर, अरे किती प्रेम आहे तुझं स्वतःच्या गाडीवर. हे गॅरेजही तुझंच आहे. मनात आणलं तर पटकन ही खोक तू भरून काढू शकशील. गाडीला लागलेलं हे गालबोट तू तसंच का ठेवलंयस?'
समीर म्हणाला, 'मला वाटलंच होतं तू हा प्रश्न विचारशील असं. अरे यामागे एक छोटीशी गोष्ट आहे.'
ते दोघे जेव्हा त्या गाडीत बसून फेरफटका मारायला निघाले तेव्हा समीरनं रघूला ती गोष्ट सांगितली.
'अरे, तेव्हा मी ही गाडी नवीनच खरेदी केली होती. असा सुंसाट निघालो होतो तिला पळवत. दूरवर रस्त्याजवळच्या झुडुपात काहीतरी हालतंय असं मला वाटलं. पण गाडीचा वेग कमी करून पाहायची मला अजिबात इच्छा नव्हती. मी भरधाव गाडी दामटत पुढे चाललो आणि तेवढ्यात एक वीट दाणकन् येऊन कारच्या दरवाजावर आदळली.'
'आपल्या नव्या गाडीला कुणी वीट फेकून मारलं हे लक्षात आलं आणि मी तिरमिरलो. त्याच तिरीमिरीत मी दार उघडलं आणि समोर रडत उभ्या असलेल्या मुलावर उखडलो, म्हटलं, काय रे ए गाढवा, का मारलीस ती वीट? माझ्या नव्या गाडीची काच फुटली आणि तिचा रंगही खरवडलाय पाहा...'
'रडत रडतच तो मुलगा मला म्हणाला, काका, मी काय करू? मी वीट भिरकावली नसती तर तुम्ही गाडी थांबवली नसतीत. कित्येक गाड्यांना मी हात दाखवला पण कुणीही गाडी थांबवली नाही. अहो, माझा मोठा भाऊ पांगुळगाड्यावरून पडलाय, मला पेलवत नाहीय त्याला उचलून पुन्हा व्हीलचेयरमध्ये बसवणं.प्लीज... मला तोडी मदत कराल का?'
'तेव्हा माझी नजर बाजूला गेली आणि मी थंड पडलो. रघ्या, खरं सांगतो रे, लाज वाटली मला त्याच्याकडे लक्ष न देता गाडी पुढे दामटल्याची. त्या घटनेची आठवण मनात कायम रहावी, इतरांनाही आपली गरज असू शकते हे नेहमी लक्षात असावं म्हणून मी गाडीला पडलेली खोक दुरुस्त केली नाही आणि त्या ठिकाणी उडालेला रंग परत लावला नाही.'

Tuesday, August 21, 2012

श्रद्धा आणि तर्क

-संध्या पेडणेकर
एकदा एक सिद्ध पुरुष आपल्या शिष्यावर प्रसन्न झाले. म्हणाले, 'आज मी तुला परिस देतो.'
ते दोघेही परिस आणण्यासाठी निघाले.
गावाबाहेर आल्यावर एका निर्जन ठिकाणी सिद्ध पुरुषाने शिष्याला एके ठिकाणी खोदायला सांगितलं. शिष्यानं जमीन खोदली तेव्हा त्याला तिथे  लोखंडाची, गंज चढलेली एक छोटी डबी दिसली.
याच डबीत परिस आहे असं सिद्ध पुरुषानं शिष्याला सांगितलं.
शिष्य मोठा विद्वान होता. त्याला आपल्या ज्ञानाबद्दल सार्थ अभिमानही होता.
त्याला वाटलं की, हा जर खरा परिस असता तर त्याच्या  स्पर्शानं लोखंडाची ही डबी सोन्याची नसती का झाली? डबी अजूनही लोखंडाचीच आहे म्हणजे हा काही परिस नव्हे.
डबी उघडून पहायचे कष्टही त्याने घेतले नाहीत. गुरुचा अनादर होऊ नये म्हणून त्यानं ती डबी स्वतःजवळ ठेवली पण गुरुबद्दलचा त्याच्या मनातील आदर थोडा उणावलाच होता.
गुरुपासून त्याची वाट वेगळी निघाली तेव्हा आधी त्यानं ती डबी भिरकावून दिली.
तो पुढे निघणार तेवढ्यात त्याचं भिरकावून दिलेल्या त्या डबीकडे लक्ष गेलं.
डबी सोन्याची झाली होती आणि झळाळत होती.
त्यानं डबी उचलून घेतली. ती उघडी होती.
त्याच्या लक्षात आलं की डबीला आतून मखमलीचा अस्तर लावलेला होता आणि त्या अस्तरामुळेच परिसाचा लोखंडाच्या डबीला स्पर्श झालेला नव्हता.
त्यानं डबी भिरकावली तेव्हा ती उघडली असावी आणि परिसाचा डबीला स्पर्श झाला असावा.
त्यानं डबीत परिस शोधला पण तो घरंगळत कुठेतरी जाऊन पडला असावा. खूप शोधूनही शिष्याला परिस काही मिळाला नाही. अविश्वास आणि श्रद्धाविहीन तर्कामुळे तो परिसाला मुकला होता.

Saturday, August 18, 2012

रिकामे हात

-संध्या पेडणेकर
अलेक्झांडरची शवयात्रा निघाली.
त्याची शवयात्रा पाहाण्यासाठी लाखो लोक जमले होते.  तिरडीच्या दोन्ही बाजूंनी अलेक्झांडरचे दोन हात लटकत होते. सगळ्यांनाच या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं कारण अलेक्झांडर मोठा सम्राट होता, त्याची तिरडीसुद्धा लोकांनी इतक्या हलगर्जीपणानं बांधावी? असे कसे त्याचे दोन्ही हात अधांतरी लटकू दिले? कुणाच्याच कसं लक्षात नाही आलं?
पण मग हळूहळू लोकांना समजलं की हा हलगर्जीपणा नव्हता. खुद्द अलेक्झांडरचीच तशी इच्छा होती. त्यानं मरण्यापूर्वी सांगितलं होतं की माझी अंतीम यात्रा काढताना माझे दोन्ही हात लोकांना दिसतील असे तिरडीबाहेरच ठेवावे. त्यामुळे, जगज्जेता अलेक्झांडरसुद्धा शेवटी रिकाम्या हातीच गेला, जन्मभर विजयासाठी केलेला सगळा प्रपंच निरर्थकच होता हे लोकांना कळेल.
मरण्यापूर्वी काही वर्षांआधी अलेक्झांडर एका ग्रीक फकीराला डायोजनीसला भेटायला गेला होता. त्यावेळी डायोजनीसने अलेक्झांडरला विचारलं होतं, 'संपूर्ण जग जिंकून घेतल्यानंतर काय करायचं याबद्दल तू विचार केलायस का अलेक्झांडर?' डायोजनीसचा प्रश्न ऐकून अलेक्झांडरनं उदास स्वरात उत्तर दिलं, 'मला खूप चिंता वाटते. कारण, दुसरं जग नाहीय. तेव्हा, खरंच, हे जग जिंकून घेतल्यानंतर पुढे मी काय करावं?'
खरं तर अजून त्यानं संपूर्ण जग जिंकलेलंच नव्हतं, पण तरीही, जग जिंकून घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यानंतरही त्याची वासना बुभुक्षितच रहाणार होती!
मोठा जुगारी होता अलेक्झांडर. स्वतःजवळचं सगळं त्यानं डावावर लावलं आणि मोठमोठ्या लढाया जिंकून मोठमोठे ढीग लावले धन-संपदेचे.
त्याच अलेक्झांडरला मृत्यूपूर्वी जणू साक्षात्कार झाला.
रिकाम्या हाताने येतो आणि माणूस रिकाम्या हातीच जातो.
 आपल्याला झालेला साक्षात्कार लोकांपर्यंत पोहोचावा अशी त्याची इच्छा होती. लोकांनीही आपले रिकामे हात पाहावे, जाताना अलेक्झांडर सोबत काहीही घेऊन जाऊ शकला नाही हे लोकांना कळावं अशी त्याची इच्छा होती..... मरणातही बरंच काही जिंकून नेलं त्यानं. 

Wednesday, August 8, 2012

तत्वमसि श्वेतकेतु

-संध्या पेडणेकर
बरीच वर्षे विद्यार्जन केल्यानंतर श्वेतकेतु घरी परतला. वडिलांनी त्याला विचारलं, 'विद्यार्जन पूर्ण झालं म्हणतोस तर मग ब्रह्मज्ञान मिळवलंस का? कारण त्याविना इतर सर्व विद्या व्यर्थच.'
श्वेतकेतु वडिलांना म्हणाला, 'माझ्या गुरुदेवांना जर त्याबद्दल माहिती असती तर त्यांनी मला अवश्य ब्रह्मज्ञान दिलं असतं. कारण ज्या ज्या विद्या त्यांना अवगत होत्या त्या सर्व त्यांनी मला दिल्या. ते स्वतः मला म्हणाले की, श्वेतकेतु, तुला शिकवण्यासारखं माझ्यापाशी आता काहीही शिल्लक राहिलं नाही. आता तू स्वगृही परतू शकतोस.'
श्वेतकेतूचं म्हणणं ऐकल्यावर उद्दालक - श्वेतकेतुचे वडील - त्याला म्हणाले, 'म्हणजे ही विद्या शिकवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली म्हणायची. ठीक आहे, बाहेर जा आणि एक फळ तोडून आण झाडावरून.'
श्वेतकेतु झाडावरून फळ तोडून घेऊन आला.
वडील त्याला म्हणाले, 'काप ते फळ.'
श्वेतकेतूनं फळ कापलं. फळात खूप बिया होत्या.
वडील त्याला म्हणाले, 'यातील एक बीज निवड.'
श्वेतकेतूनं बीज निवडलं तेव्हा वडिलांनी त्याला विचारलं, 'एवढ्याश्या बीजातून प्रचंड वृक्ष बनू शकेल का?'
श्वेतकेतु म्हणाला, 'हो तर, बीजातूनच वृक्षाचा जन्म होतो.'
वडील त्याला म्हणाले, 'म्हणजे, यातच वृक्ष लपलेला असायला हवा. तू ते बीज चीर. त्यात लपलेला वृक्ष आपण शोधून काढू.'
श्वेतकेतूनं बीज कापलं पण त्यात काहीही नव्हतं. तिथे केवळ शून्य होतं. श्वेतकेतू वडिलांना म्हणाला, 'यात तर काहीही नाहीय.'
उद्दालक त्याला म्हणाले, 'जे दिसत नाही, जे अदृश्य आहे त्यातूनच एक विशाल वृक्ष निर्माण होतो. आपणही अशाच शून्यातून जन्माला आलो.'
यावर श्वेतकेतूनं विचारलं, 'म्हणजे, मीसुद्धा त्या महाशून्यातूनच जन्माला आलो का?'
श्वेतकेतूच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याचे वडील उद्दालक त्याला म्हणाले, 'तत्वमसि श्वेतकेतु - होय श्वेतकेतु, तू सुद्धा याच महाशून्यातून आला आहेस.तू त्याचाच एक भाग आहेस.'
वडिलांचं ते वाक्य  ऐकलं आणि श्वेतकेतूला ज्ञानप्राप्ती झाली असं म्हणतात.



Wednesday, August 1, 2012

जीवनाचे गणित

-संध्या पेडणेकर
एक होती गोम.
गोम म्हणजे शंभर पायांचा कीडा.
ती वेगानं सरपटत कुठेतरी चालली होती.
एका सशाची तिच्यावर नजर पडली.
ससा पाहातच राहिला. त्याला वाटलं,  ही गोम चालते तरी कशी? अबब! किती तिचे ते पाय. आधी कोणता पाय उचलायचा, मागनं कोणता पाय उचलायचा हे कसं कळत असेल तिला? भयंकर कठिण आहे बुवा. किती गणितं करावी लागत असतील हिला.
सशानं तिला हाक मारली. म्हणाला, 'अगं थांब. कुठे इतक्या लगबगीनं चाललीस? असं सांग, की तुझे इतके पाय आहेत तर त्यापैकी कोणता पाय कधी उचलायचा हे तुला कसं कळतं? चालताना कधी तुझी त्रेधा तिरपीट नाही उडत? कधी एकदम दहा पावलं उचलली असं वगैरे झालं का? तारांबळ होत असेल ना तुझी अगदी? खरं सांग, पायात पाय अडकून कधी पडली-बिडली होतीस की नाही? नाही? कम्मालचए. ए, मला शिकव ना हे गणित.'
खरं तर गोमेनं आपल्या पायांबद्दल असा आणि इतका विचार कधी केलाच नव्हता.
ती सुर सुर चालायची. जन्मली तेव्हापासूनच.
तिला आठवतं तेव्हापासूनच तिचे असे शंभर पाय होते.
कधी तिच्या मनात हा प्रश्न उठलाच नाही की आपल्याला इतके पाय कसे काय?
पहिल्यांदाच तिने खाली पाहिलं आणि ती घाबरली. तिला वाटलं - इतके पाय! शंभर! आपल्याला तर शंभरपर्यंत आकडेसुद्धा नीटपणे मोजता येत नाहीत.
ती सशाला म्हणाली, 'याबद्दल मी कधी विचारच केला नव्हता. आता तू लक्षात आणून दिलंयस तर करेन विचार. निरीक्षण-परीक्षण करेन आणि जो उलगडा होईल तो सांगेन तुला.'
पण मग ती गोम पुन्हा पहिल्यासारखी चालू शकली नाही.
थोडं अंतर कापलं आणि ती गळाठली.
आता ती चालत कुठे होती, आता तर तिला शंभर पायांचं गणित सोडवायचं होतं.
एवढीशी गोम आणि शंभर पाय! एव्हढीशी तिची ती अक्कल आणि एव्हढं मोठं गणित!
हे प्रचंड गणित ती सोडवणार तरी कशी? 

Tuesday, July 31, 2012

काल्पनिक बंधनात अडकलेले मन

-संध्या पेडणेकर
एकदा वाळवंटातील एका सरायमध्ये एक मोठा काफिला आला. काफिल्यातील सारे प्रवासी दिवसभराच्या प्रवासानं खूप थकले होते.
उंटांच्या मालकाने नोकरांना आज्ञा दिली आणि त्यानुसार उंटांच्या गळ्यात दोरखंड बांधले गेले. मग ते दोरखंड अडकविण्यासाठी खुंट्या गाडताना एकाच्या लक्षात आलं की एका उंटाचा दोरखंड आणि खुंटी दोन्ही हरवलेत.
उंटाला मोकळं कसं सोडणार, कारण रात्री तो चालत दूर निघून जाईल आणि हरवेल असं त्याला वाटलं. त्याने ही गोष्ट आपल्या मालकाला सांगितली. काफिल्याचा मालकाने सरायच्या मालकाकडे रात्रीपुरता दोरखंड आणि खुंटी मागितली. सरायच्या मालकानं दिलगिरी व्यक्त करत सांगितलं की, 'खुंट्या किंवा दोरखंड आमच्याकडे नाहीत. पण तुम्ही असं का नाही करत? - तुम्ही खुंटी गाडल्यासारखं करा, उंटाच्या गळ्यात दोरखंड अडकवल्याचा अभिनय करा आणि उंटाला झोपून जायला सांगा.'
हा उपाय लागू होईल हे त्या काफिल्याच्या मालकाला  पटेना, पण दुसरा इलाज नव्हता त्यामुळे त्यानं सरायच्या मालकाचं म्हणणं मान्य केलं. त्यानं खुंटी गाडण्याचा, दोरखंड उंटाच्या गळ्यात अडकवण्याचा अभिनय तंतोतंत केला आणि इतर उंटांसारखंच त्या उंटालाही झोपायला सांगितलं.
आश्चर्य म्हणजे, तोवर ताटकळत उभा असलेला उंट मालकाची आज्ञा ऐकून खाली बसला आणि झोपी गेला.
हे पाहून काफिल्याच्या मालकाला थोडं हायसं वाटलं.
सकाळी पुढल्या टप्प्याच्या प्रवासासाठी निघताना इतर सर्व उंटांच्या गळ्यात अडकवलेले दोरखंड काढले गेले, खुंट्या उखडून काढल्या गेल्या. सगळे उंट पुढल्या प्रवासासाठी  सज्ज झाले. पण काल्पनिक दोरखंडाने जखडलेला उंट ढिम्म उभा राहिना.
काफिल्याचा मालक त्रासला. सरायच्या मालकापुढे त्यानं तक्रारीच्या सुरात गार्‍हाणं मांडलं. म्हणाला, 'काय चेटूक केलंत तुम्ही माझ्या उंटावर, आता तो उठून उभा राहायलासुद्धा तयार नाहीय. मी पुढच्या प्रवासाला निघणार कसा?'
सरायच्या म्हातार्‍या मालकानं म्हटलं, 'आधी त्याच्या गळ्यात बांधलेला दोर काढा आणि तो दोर बांधलेली खुंटी जमिनीतून काढा.'
काफिल्याच्या मालकानं बुचकळ्यात पडत म्हटलं, 'पण त्याच्या गळ्यात कोणताही दोरखंड नाही आणि तो कोणत्याही खुंटीला बांधलेला नाही...'
सरायच्य मालकानं म्हटलं, 'तुमच्या दृष्टीनं नाहीय. उंटाल मात्र आपण बांधले गेलेलो आहोत असंच वाटतंय. जा, खुंटी उपटा. दोरखंड काढा.'
काफिल्याच्या मालकानं मग उभे राहायला तयार नसलेल्या त्या उंटाजवळ  येऊन त्याच्या गळ्यातील दोरखंड काढल्याचा अभिनय केला, खुंटी उपटल्याचा अभिनय केला.
आश्चर्य! अंग झटकत तो उंट उठून उभा राहिला आणि इतर उंटांसोबत पुढच्या प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
काफिल्यातील लोकांना याचं खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी सरायच्या मालकाला यामागील रहस्य काय असं विचारलं तेव्हा तो हसत त्यांना म्हणाला, ' बाबांनो, उंटच नव्हे तर माणसांचंही असंच असतं. काल्पनिक खुंट्यांना सगळे अडकलेले असतात. खरं तर, उंटांबद्दल मला काहीच अनुभव नाही, माणसांच्या अनुभवावरूनच मी तुम्हाला हा सल्ला दिला होता.'

Tuesday, July 24, 2012

साचलेलं ज्ञान म्हणजे कचरा

-संध्या पेडणेकर
झेन फकीर रिंझाईंशी संबंधीत एक घटना सांगितली जाते.
ते एका टेकडीवर रहात असत.
एकदा एक पंडित त्यांना भेटायला आले.
चढण चढण्याचा त्यांना सराव नसावा, कारण पोहोचले तेव्हा त्यांना चंगलीच धाप लागलेली होती.
पण त्यांच्या मनात प्रश्नांनी नुसता धुमाकूळ माजवलेला होता.
आल्या आल्या त्यांनी रिंझाईंवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली - ईश्वर आहे की नाही हे मला जाणून घ्यायचंय. शिवाय, आत्मा आहे की नाही? ध्यान म्हणजे काय? बुद्धत्व म्हणजे काय? संबोधिची घटना... या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचंय.
त्यांचा उतावीळपणा पाहून रिंझाईंना मौज वाटली. ते म्हणाले, 'आपण नुकतेच पोहोचताहात.  थोडी विश्रांती घ्या. मी आपल्यासाठी गरम चहा आणतो. चहा पिऊ, नंतर करू चर्चा, कसं?'
रिंझाई चहा घेऊन आले. पंडितांच्या हाती कप दिला आणि त्यात ते चहा ओतू लागले. कप भरला. पण रिंझाई थांबले नाहीत. चहा कपातून ओसंडू लागला. पंडित म्हणाले, 'अहो थांबा. कप भरलाय. त्यात थेंबभर चहाची जागाही उरलेली नाही. आणखी चहा कपात रहाणार कसा?'
रिंझाई म्हणाले, 'मला वाटलं होतं तुम्ही पोपटपंची करणारे पोकळ पंडित असाल बहुतेक, पण नाही, तुमच्यात थोडी अक्कल आहे असं दिसतं. कप भरलेला असेल तर त्यात आणखी चहा ओतता येत नाही हे तुम्हाला समजतं. मग जरा विचार करून सांगा, आपला प्याला रिकामा आहे का? समजा भेटलाच ईश्वर, तर त्याला आत्मसात करू शकाल आपण? बुद्धत्वाला उगवू देण्यासाठी तुमच्या अंतःकरणाचं आकाश मोकळं आहे का? तुमच्या अंतःकरणात इतकं ज्ञान साचलंय की समाधीचा एखादा थेंबही त्यात सामवू शकणार नाही. साचलेलं ज्ञान म्हणजे कचरा, त्याचा निचरा झाल्याशिवाय स्वच्छ समाधी लागणार कशी? बुद्धत्व येणार कुठून? तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन, पण तुम्ही ती ग्रहण करू शकाल का?'

Tuesday, July 10, 2012

या शरीराची किंमत काय?

-संध्या पेडणेकर
एकदा प्रसिद्ध संत जलालुद्दीन रूमी यांना दरोडेखोरांनी पकडलं. त्याकाळी गुलामगिरीची पद्धत होती. ते रूमींना गुलामांच्या बाजारात विकण्यासाठी घेऊन निघाले.
रूमी धट्टे-कट्टे आणि उंचे-पुरे होते. डाकूंना वाटलं की गुलामांच्या बाजारात या कैद्याची चांगली किंमत मिळेल.
बाजाराच्या रस्त्यात एक माणूस त्यांना भेटला. तो गुलाम खरेदी करायला निघाला होता. बाजारापर्यंत जाण्याचा त्रास वाचेल म्हणून दरोडेखोरांनी त्या माणसाला रूमींची किंमत काय द्याल असं विचारलं. तो माणूस म्हणाला, 'मी याचे दोन हजार दीनार द्यायला तयार आहे, बोला, विकणर का?'
डाकू खूश झाले. पण रूमी त्यांना म्हणाले, 'थांबा, घाई करू नका. थोडं पुढे चला. योग्य किंमत देणारा भेटेल.'
डाकूंनी त्यांचं म्हणणं मान्य केलं. ते पुढे चालले.
पुढे त्यांना एक व्यापारी भेटला. रूमींना पाहून तो डाकूंना म्हणाला, 'मी याचे तीन हजार दीनार देईन. बोला, विकणार का?'
आता त्या दरोडेखोरांच्या मनात खूप हाव निर्माण झाली. त्यांनी आपसात मसलत करत म्हटलं, 'हा फकीर अगदी खरं बोलला बरं.' त्यांनी मग काय करावं असं पुन्हा रूमींनाच विचारलं. पण रूमी त्यांना म्हणाले, 'आत्ता नाही.'
पुढे त्यांना एक सम्राट भेटला. तो पाच हजार दीनार द्यायला तयार होता. डाकूंनी एवढ्या रकमेची कल्पनासुद्धा केली नव्हती. रग्गड झाली किंमत असं वाटून त्यांनी लगेच रूमींना विकायचं ठरवलं. त्यांना वाटलं,'सम्राटापेक्षा जास्त किंमत देऊन याला विकत घेणारा आपल्याला कोण भेटणार?'
पण पुन्हा रूमींनी त्यांना अडवलं. म्हणाले, 'नको, एवढ्यात नका विकू मला. अजून माझी खरी किंमत करणारा आला नाहीय. थोडा धीर धरा.'
डाकूंना राहवत नव्हतं, पण लोभ आवरेना. शिवाय आतापर्यंत रूमींनी म्हटलेलं खरं ठरलं होतं. शेवटी त्यांनी रूमींचं ऐकायचं ठरवलं.
ते पुढे चालले. समोरून डोक्यावर गवताचा भारा घेऊन एक माणूस येत होता. डाकू फकीराला विकायला नेत आहेत हे समजलं तसं त्यानं डाकूंना विचारलं, 'विकणार का याला?'
त्याला झिडकारत डाकू म्हणाले, 'हो, पण तू याची काय किंमत देणार? चल नीघ.'
डोक्यावरचा भारा खाली टाकत तो म्हणाला, 'गवताचा हा भारा देईन याच्या बदल्यात.'
ते ऐकून रूमी लगेच म्हणाले, 'ठीक. बरोब्बर किंमत लावली. या शरीराची हीच किंमत योग्य आहे. हा माणूस शरीराची खरी किंमत जाणतो, यालाच हे शरीर विका.'
Rumi Quote

पराजित नेपोलियन

-संध्या पेडणेकर
पराजित नेपोलियनला सेंट हेलेना नावाच्या एका बेटावर नजरबंदीत ठेवलं होतं. त्यांच्यासोबत त्यांचे खाजगी डॉक्टरही होते. विजयमोहिमेतही हे डॉक्टर नेपोलियनसोबत राहिले होते. साधारण कैदी बनून जीवन कंठावं लागणार्‍या नेपोलियनला पाहून त्यांना खूप वाईट वाटत असे.
एके दिवशी डॉक्टर आणि नेपोलियन बेटावर फेरफटका मारण्यासाठी निघाले. एका छोट्याशा पाऊलवाटेवरून ते दोघे चालले होते. तेवढ्यात समोरून डोक्यावर गवताचा भारा घेतलेली एक स्त्री आली. भारा एवढा मोठा होता की त्याखाली तिचा अर्धाअधिक चेहरा झाकला गेला होता.  ती नीट पाहू शकत नव्हती.
डॉक्टर ओरडून तिला म्हणाला, 'दूर हो, दूर हो. पाउलवाटेवरनं कोण चाललंय याची कल्पना तरी आहे का तुला?'
गवत वाहून नेणार्‍या त्या स्त्रीच्या लक्षात काही येण्याअगोदर नेपोलियनने हात धरून डॉक्टरना थोडं बाजूला नेलं. ती स्त्री नेपोलियनच्या इतक्या जवळून पुढे गेली की तिच्य डोक्यावरच्या भार्‍यातील गवताच्या काही काड्यांचा नेपोलियनच्या शरीराला स्पर्श झाला.
डॉक्टरना खूप वाईट वाटलं, पण नेपोलियनवर याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी डॉक्टरांची समजूत घालत म्हटलं, 'गड्या, संपले ते स्वप्नभारले दिवस. आता जरा जागा हो. डोंगराला म्हटलं की सरक, नेपोलियन येतोय तर त्याला सरकावं लागलं असतं असे ते दिवस आता पालटले. आता गवत वाहून नेणार्‍यांसाटीसुद्धा आपल्याला सरकावं हे लागेलच.'
जय आणि पराजयाचा खरा अर्थ नेपोलियन जाणून होता.
एका कामगार स्त्रीसाठी नेपोलियनना आपला मार्ग वळवावा लागला याची डॉक्टरना मात्र चुटपुट लागून राहिली.
---

Friday, July 6, 2012

दान काय देणार?

-संध्या पेडणेकर
ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध घरी परतले. अकरा वर्षांनंतर ते घरी परतले होते. त्यांनी घर सोडलं त्यावेळी त्यांचा मुलगा राहुल एक वर्षाचा होता. ते परतले तेव्हा तो बारा वर्षांचा झाला होता.
यशोधरा - गौतम बुद्धांची पत्नी - त्यांच्यावर खूप रागावलेली होती. गौतम बुद्धांवर नजर पडताच तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली - 'एवढासुद्धा भरंवसा वाटला नाही का तुम्हाला माझ्याबद्दल? 'मी चाललो', असं जर मला म्हटलं असतंत तर मी तुम्हाला रोखून ठेवेन असं तुम्हाला वाटलं होतं का? मी क्षत्राणी आहे हे तुम्ही कदाचित विसरला होतात तेव्हा. आम्ही जर पतीला टिळा लावून रणांगणावर पाठवू शकतो तर तुम्हाला सत्याचा शोध घेण्यासाठी पाठवू शकले नसते का मी? तुम्ही माझा अपमान केला.'
कित्येक लोकांनी बुद्धांना बर्‍याच प्रकारचे प्रश्न विचारले होते पण यशोधरेच्या प्रश्नांनी  बुद्धांना निरुत्तर केलं.
पुढे यशोधरेनं बुद्धांना विचारलं, 'जंगलात जाऊन तुम्ही जे मिळवलं ते तुम्हाला इथे राहून मिळालं नसतं का?' याचं उत्तरही बुद्ध होकारार्थी देऊ शकले नाहीत कारण सत्य तर सर्व ठिकाणी विद्यमान असतं.
पण यशोधरेनं त्यानंतर जे केलं ते वर्मी घाव घालणारं होता. यशोधरेनं आपल्या मुलाला - राहुलला पुढे केलं आणि ती त्याला म्हणाली, 'पाहा, हे समोर हातात भिक्षापात्र घेऊन जे उभे आहेत ना, तेच तुझे वडील आहेत. तू एक दिवसाचा होतास तेव्हा हे तुला सोडून पळून गेले होते. त्यानंतर हे आत्ता परतले. आता जातील तेव्हा देव जाणे पुन्हा कधी भेट होईल. तू त्यांच्याकडून आपला वारसा मागून घे. तुला देण्यासाठी यांच्याजवळ जे काय आहे ते मागून घे.'
बुद्धांजवळ त्याला देण्यासाठी काय असणार? यशोधरा सूड उगवून घेत होती, मनात साठलेला राग शब्दांवाटे व्यक्त करत होती. आपण विचारलेल्या प्रश्नामुळे परिस्थितीला अचानक वेगळी कलाटणी मिळेल याची 
तिला अजिबात कल्पना नव्हती.
तिचं बोलणं संपतं न संपतं तो बुद्धांनी आपलं भिक्षापात्र राहुलला दिलं. ते म्हणाले, 'बेटा, मला जे मिळालं ते मी तुला देतो. या व्यतिरिक्त तुला देण्याजोगं माझ्याजवळ काहीही नाही. तू संन्यासी हो!' 

ऐकलं आणि यशोधरेच्या डोळ्यांना आसवांची धार लागली.
बुद्ध म्हणाले, 'समाधीच माझी संपदा आहे. संन्यास घेण्यानंच ती वाटता येते. खरं तर, तुलाही घेऊन जावं म्हणूनच मी आलो होतो. ज्या संपदेचा मी धनी झालो तिची 
तू ही धनी व्हावंस असं मला वाटतं.'
राहूलने पित्याची इच्छा पूर्ण केली
आपण क्षत्राणी आहेत हे यशोधरेनंही सिद्ध करून दाखवलं. बुद्धांकडून दीक्षा घेऊन ती सुद्धा भिक्षुंमध्ये मिसळून गेली. इतकी, की त्यानंतर बौद्ध शास्त्रांमध्ये तिचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. 

Friday, June 15, 2012

चाणाक्ष गाढव

-संध्या पेडणेकर
व्यवहारचातुर्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल अशी ही  ईसापनीतीतील एक गोष्ट.
एकदा एक सिंह, एक लांडगा आणि एक गाढव एकत्र शिकारीसाठी निघाले. तिघांनी मिळून भरपूर शिकार केली आणि मांसाचा ढीग जमवला.
मग सिंह लांडग्याला म्हणाला, 'तू या मांसाचे तीन समान वाटे कर. आपण तिघांनी मिळून शिकार केली तेव्हा प्रत्येकाला समान वाटा मिळायला हवा.'
लांडग्यानं सिंहाच्या म्हणण्याचं शब्दशः पालन केलं आणि मांसाचे तीन समान वाटे केले.
सिंहाला राग आला आणि त्यानं तत्क्षणी लांडग्यावर झेप टाकून त्याची मानगूट पिरगळली आणि मेलेल्या लांडग्यालाही मांसाच्या ढिगार्‍यावर टाकलं.
मग सिंह गाढवाकडे वळून म्हणाला, 'मांसाचे वाटे करायची जबाबदारी आता मी तुझ्यावर सोपवतो. समान दोन वाटे कर, आपल्या दोघांसाठी.'
गाढवानं मेलेल्या जनावरांच्या मांसामधून एक कावळा उचलला आणि बाजूला काढून ठेवला. मग मोठ्या ढिगाकडे इशारा करत तो सिंहाला म्हणाला, 'महाराज, हा आपला वाटा.'
सिंह एकदम खूश झाला. तो गाढवाला म्हणाला, 'वाः वाः, शहाणा आहेस. वाटण्या करण्याची कला कुठे शिकलास तू?'
गाढवानं सिंहानं केलेल्या प्रशंसेचा मान तुकवून स्वीकार केला. मग मनोमन तो बोलला,'या मेलेल्या लांडग्यानं मला सिंहासोबत केलेल्या शिकारीची वाटणी कशी करायची ते शिकवलं.'
---

Friday, June 1, 2012

क्षमा

-संध्या पेडणेकर 
कुरुक्षेत्रावर घडलेल्या युद्धानंतरच्या रात्री अश्वत्थाम्याने पांडवांच्या शिबिरास आग लावली. आगीपासून प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांचा त्याने बाण मारून वध केला. महाभारताच्या युद्धातून पांडवपक्षाचं जे काही सैन्यबळ वाचलं होतं त्याचा पार धुव्वा उडाला आणि पांडव वंशापैकी त्यावेळी जे कुणी शिबिरात होते ते सुद्धा मारले गेले. 
युद्धात विजय मिळाल्यानंतर पाच पांडव आणि सात्यकी यांना घेऊन कृष्ण इतर ठिकाणी गेला होता त्यामुळे ते तेवढे वाचले. पांडवांच्या सैन्यात आता एवढेच लोक उरले होते.
सकाळी जेव्हा ते शिबिरात परतले तेव्हा तिथे त्यांना अर्धवट जळालेल्या प्रेतांचा खच पडलेला दिसला. 
महाराणी द्रौपदीच्या पाचही पुत्रांचे क्षतविक्षत मृतदेह तेथे पडलेले होते. द्रौपदीच्या व्यथेचं वर्णन काय सांगावं....
अर्जुनानं द्रौपदीला धीर दिला. तो म्हणाला, यांच्या मारणार्‍या नराधमाचं - त्या अश्वत्थाम्याचं धडावेगळं शीर पाहिल्यानंतरच तू आज स्नान कर.'
आपल्या रथात बसून श्रीकृष्णाबरोबर अर्जुन अश्वत्थाम्याला शोधण्यासाठी निघून गेला.
अश्वत्थ्याम्यानं अर्जुनाला पाहिलं तेव्हा तो प्राणभयानं पळू लागला. पण अर्जुनानं त्याचा पाठलाग केला आणि त्याला बंदी बनवलं. त्यानं अश्वत्थाम्याला द्रौपदीसमोर आणून उभं केलं.
अश्वत्थाम्यावर नजर पडताच भीम म्हणाला, 'तात्काळ याला ठार मारलं पाहिजे.'
सगळ्यांचाच राग उफाळलेला होता.
पण द्रौपदीनं सगळ्यांना सबूरीनं घेण्यास सांगितलं. द्रौपदी म्हणाली, 'माझे पुत्र मारले गेले त्यामुळे पुत्रशोक म्हणजे काय हे मी चांगलं जाणते. याची माता कृपी आपल्या गुरुपत्नी आहेत. माझ्यासारखं पुत्रवियोगाचं दुःख त्याना सहन करावं लागू नये असं मला वाटतं. आपल्याला उत्तम शस्त्रविद्या देणार्‍या गुरु द्रोणांचं त्यांच्या या पुत्रात आम्हाला दर्शन होतं. याच्याशी निष्ठूरपणानं वागणं आपल्याला शक्य नाही. सोडून द्या, जाऊ दे याला.'
जिच्या पाच मुलांची प्रेतं समोर पडलेली असताना आणि त्यांचा वध करणारा समोर बंदी होऊन उभा असताना द्रौपदीनं  त्याला केलेली क्षमा खरोखर धन्य होय.
---

Tuesday, May 22, 2012

क्षण मुक्तीचा


-संध्या पेडणेकर
नागार्जुन एक फकीर होते. एक राणी त्यांच्या व्यक्तीमत्वावर भाळली. एके दिवशी साहस एकवटून तिने नागार्जुनांना आपल्या महालात येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या सानिध्यात काही क्षण घालविण्याची तिची इच्छा होती. त्यांचे अभाव दूर करण्यासाठी त्यांना काहीतरी देण्याचीही तिची इच्छा होती.
नागार्जुनांनी राणीचं आमंत्रण स्वीकारलं. राणीच्या महालात ते तिचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी गेले. त्यांच्या येण्यानं राणी आनंदली. तिने त्यांचे स्वागत केले. त्यांची उत्तम सरबराई राखली.
संध्याकाळ झाली तशी नागार्जुनांनी राणीचा निरोप घेतला. निरोप देताना राणी अत्यंत नम्रतेनं त्यांना म्हणाली, महाराज, मला आपणाकडून काही हवंय.
काय हवंय?, असं नागार्जुनांनी राणीला विचारलं.
राणी म्हणाली, आपण आपलं भिक्षापात्र जर मला दिलंत तर....
पटकन नागार्जुनांनी राणीला आपलं भिक्षापात्र दिलं. राणीनं मग त्यांना एक रत्नजडित स्वर्णपात्र दिलं. ती म्हणाली, त्या पात्राऐवजी आपण हे पात्र घ्या. मी दररोज आपल्या भिक्षापात्राची पूजा करेन.
राजमहालातून बाहेर पडताच नागार्जुनांच्या हातातील त्या मौल्यवान पात्रावर एका चोराची नजर खिळली. तो त्यांचा पाठलाग करू लागला. एकांत मिळताच त्यांच्या हातून ते पात्र हिसकावून घेण्याचा त्याचा विचार होता.
थोडं तर चालून गेल्यानंतर नागार्जुनांनी हातातील ते पात्र फेकून दिलं.
तत्क्षणी चोरानं ते उचललं.
त्याला वाटलं, काय माणूस आहे हा! एव्हढं बहुमूल्य पात्र यानं सरळ फेकून दिलं?
काही का असेना, आपल्याला ते मिळालं ना, झालं तर. मग त्याच्या मनात विचार आला, आपण निदान यासाठी त्याचे आभार मानायला हवेत.
पुढे होऊन त्यानं नागार्जुनांना रोखलं. म्हणाला, महाराज, मला आपले आभार मानायचे आहेत. आपल्यासारखे लोकही या जगात आहेत यावर आत्तापर्यंत माझा अजिबात विश्वास नव्हता. मला आपली पायधूळ घेण्याची परवानगी द्या.
नागार्जुन हसतच त्याला म्हणाले, जरूर.
चोरानं खाली वाकून त्यांच्या पायांवर हात ठेवला आणि तो आपल्या कपाळी लावला. त्या क्षणी त्याच्या कृतज्ञ हृदयात त्या पुसटशा स्पर्शानं जे भाव जागृत झाले त्यामुळे तो व्याकुळला. नागार्जुनांना त्यानं विचारलं, बाबा, मला आपल्यासारखं व्हायचं असेल तर किती जन्म घ्यावे लागतील?’
नागार्जुन त्याला म्हणाले, किती जन्म? तुझी इच्छा असेल तर तसं आत्ता, या क्षणीही घडू शकतं.
त्या क्षणानंतर चोर चोर राहिला नाही. पुढे तो नागार्जुनांचा शिष्य बनला.

Friday, May 18, 2012

बरी अद्दल घडली


-संध्या पेडणेकर
रामकाकांच्या घरासमोर अंगणात एक खूप मोठं झाड होतं.
त्या झाडामुळे घरावर आणि अंगणभर नेहमी सावली असायची. घराचं ते जणू छत्रच होतं.
पण त्यांच्या एका शेजार्‍याचं  म्हणणं पडलं की घर आणि अंगणावर अशी छाया टाकणारी झाडं अशुभ असतात. त्याच्या अशुभ छायेमुळे काहीतरी अप्रिय घडण्याआधी ते झाड कापून काढणंच योग्य.
शेजार्‍याचं बोलणं मानून रामूकाकांनी आपल्या अंगणातील घरादाराला सावली देणारा तो वृक्ष कापून टाकला. चुलीत जाळता येतील अशा त्या प्रचंड वृक्षाच्या छोट्या छोट्या ढलप्या पाडल्या.
वृक्ष बराच मोठा होता. त्याच्या अर्ध्या लाकडांनी रामूकाकांचं घर भरलं. अंगणातही जागा उरली नाही साठवायला.
तेव्हा मदत करण्याच्या बहाण्यानं तिथे आलेल्या त्यांच्या शेजार्‍यानं त्यांच्या संमतीनं उरलेली अर्धी लाकडं स्वतःसाठी नेली.
काही दिवसांनी, थंडपणानं विचार करताना रामूकाकांना वाटलं की, आपली सरपणाची सोय करण्यासाठी म्हणूनच त्यांच्या त्या शेजार्‍यानं त्यांना त्यांच्या अंगणातील झाड अशुभ असल्याचा आणि ते तोडण्याचा सल्ला दिला होता.
रामूकाकांना खूप वाईट वाटलं.
गावातल्या एका वयोवृद्ध व्यक्तीसमोर त्यांनी आपलं मन उघड केलं. विचारलं की, बाबा, झाड तोडलं ही माझ्या हातून चूक घडली का? असे प्रचंड वृक्ष दुर्भाग्याला आमंत्रण देतात का?
बाबा हसत म्हणाले, तुझ्यासारख्या मुर्खाच्या अंगणात उगवला हे त्या वृक्षाचं दुर्भाग्यच म्हणायला हवं. म्हणूनच त्याची कत्तल घडली आणि आता त्याला जाळलंही जाईल.
ऐकलं आणि रामूकाकांना आपल्या हातून घडलेली चूक जाणवून रडूच कोसळलं.
वयोवृद्ध बाबांनी मग रामूकाकांना सांगितलं, जाऊ दे, चुका माणसाच्या हातूनच घडतात. हरकत नाही. आपण आता मूर्ख राहिलो नाही यातच समाधान मान. इतरांच्या सल्यावर अंमल करण्याआधी सल्ला देण्यामागे त्यांचा काय हेतू आहे याचा शोध घेऊन, सल्ला नीट उमगेल तेव्हाच आणि स्वतःही त्याच्याशी सहमत असल्यासच त्यावर अंमल करावा हे समजण्याची अक्कल एक झाड गमावून जरी तू शिकलास तरी खूप झालं. या गोष्टी नीट लक्षात ठेवल्यास तर पुन्हा अशी चूक घडणार नाही तुझ्याकडून.
---

Thursday, May 17, 2012

परोपकारी लिंकन


-संध्या पेडणेकर
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन अतिशय दयाळू   व्यक्ती होते।
एकदा आपल्या मित्राबरोबर ते एका सभेत भाग घेण्यासाठी  निघाले होते.
रस्त्यात एके ठिकाणी चिखलाने भरलेला मोठा खड्डा होता  आणि त्या खड्ड्यात डुकराचे एक पिल्लू पडले होते. चिखलातून बाहेर निघण्याचे त्या पिल्लाचे सर्व प्रयत्न निष्फळ चालले होते. पिल्लू घायकुतीला आले होते.
लिंकनने आपली बग्घी थांबवली आणि स्वतः चिखलात उतरून डुकराच्या त्या पिल्लाला बाहेर काढले.
या प्रयत्नांत त्यांच्या कपड्यांवर चिखल लागला. सभास्थळी पोहोचण्यास थोडा उशीरही झाला.
थोडं पाणी घेऊन त्यांनी हात-पाय धुतले आणि ते सभास्थळी पोहोचले.
सभेच्या ठिकाणी त्यांचे चिखलानं माखलेले कपडे पाहून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली.
काही लोकांनी लिकनच्या मित्राला त्याबद्दल विचारले.
शेवटी लोकांची जिज्ञासा शांत करण्याच्या उद्देशाने सभा सुरू झाली तेव्हा आयोजकांनी त्यामागील कारण सगळ्यांना जाहीर रीत्या सांगितले. ते म्हणाले की, लिंकन इतके दयाळू आहेत की सभेच्या ठिकाणी येताना चिखलात अडकलेल्या डुकराच्या पिल्लाचे हाल त्यांना पाहावले नाहीत. त्याला चिखलातून बाहेर काढलं तेव्हाच ते सभेच्या ठिकाणी आले. यामुळेच त्यांना इथे पोहोचण्यास अंमळ उशीर झाला.
आयोजकांचं बोलणं ऐकून लिंकन लगेच उभे राहिले आणि म्हणाले की, आपला काहीतरी गैरसमज होतोय असं मला वाटतं. डुकराचं ते पिल्लू तडफडत होतं म्हणून मी त्याला चिखलातून बाहेर काढलं असं नव्हे, तर, चिखलात अडकल्यामुळे त्याचा जीव कासावीस होत असलेला मला पाहवेना म्हणून मी त्याला बाहेर काढलं. स्वतःच्याच दुःखभावनेवर मी फुंकर घातली.  
परोपकारही स्वान्तःसुखाय म्हणणारे लिंकन थोरच होते.   

Wednesday, May 16, 2012

सोंगाड्या


-संध्या पेडणेकर
एका राजाच्या दरबारात एकदा एक सोंगाड्या आला आणि त्यानं दानस्वरूपात पाच स्वर्णमुद्रा मागितल्या. राजा त्याला म्हणाला, सोंगाड्या आहेस असं म्हणतोस तर तुझ्या कलेचा काही नमूना दाखव. आम्ही तुला दान नव्हे, बक्षीस देऊ.
राजाचं बोलणं ऐकलं आणि सोंगाड्या दरबारातून बाहेर निघून गेला.
दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे शहराबाहेरच्या देवळासमोर एका साधूनं मुक्काम ठेवला. साधू मौनीबाबा होता. माळावर गुरं चरायला आणलेल्या गुराख्यांनी या मौनीबाबाबद्दल शहरात सगळ्यांना बातमी दिली. गुराख्यांनी त्या साधूच्या पायांवर डोकं टेकून आशिर्वाद मागितले होते, पण त्यांनी डोळे उघडले नव्हते. ध्यानधारणेत ते तल्लीन राहिले. त्यांचया आगमनाची बातमी शहरभर पसरली आणि दुसर्‍या दिवशी त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी जमली. होता होता बातमी राजमहालापर्यंत पोहोचली. कित्येक दरबारी दान आणि फळं-फुलं घेऊन साधूच्या दर्शनाला आले. तरीही साधूनं डोळे उघडले नाहीत आणि कोणत्याही वस्तूचा स्वीकारही केला नाही. संध्याकाळपर्यंत या महान साधूच्या आगमनाची बातमी राजाच्या कानांपर्यंत पोहोचली. राजासुद्धा धन-धान्य, सोनं-नाणं घेऊन साधूच्या दर्शनाला आला. हात जोडून त्यानं साधूच्या विनवण्या केल्या पण साधूनं राजाच्या विनवण्यांनाही दाद दिली नाही.
परतताना राजानं तिथे उपस्थित असलेल्या दरबार्‍यांना दुसर्‍या दिवशी सकाळीच दरबारात हजर रहाण्यास सांगितलं. या महान साधूला कोणत्याही प्रकारची तोसीस पडू नये म्हणून काय काय करता येईल या विषयावर त्यांना सल्ला-मसलत करायची होती.
दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे कामकाज सुरू होण्याआधीच सोंगाड्या पुन्हा दरबारात हजर झाला. राजाला तो म्हणाला, माझ्या कलेचा नमूना मी दिला आता मला पाच स्वर्णमुद्रा द्या.
राजानं आश्चर्यानं त्याला विचारलं, आपली कला तू कधी दाखवलीस आम्हाला?’
सोंगाड्या म्हणाला, दोन दिवस शहराबाहेरच्या मंदिरासमोर बसलेला तो मौनी साधू मीच तर होतो. साधूचं सोंग घेतलं होतं मी.
राजानं त्याला विचारलं, काल तुझ्यासमोर वैभवाचे ढीग लागले होते. त्यातून तू काहीही घेतलं नाहीस आणि आज पुन्हा पाच स्वर्णमुद्रांसाठी तू दरबारात आलास. असं का?’
सोंगाड्या म्हणाला, महाराज, काल मी साधूचा वेष धारम केला होता. दान स्वीकारलं सतं तर माझ्या सोंगाचा मान राहिला नसता. शिवाय, मला फक्त पाच स्वर्णमुद्रांचीच गरज आहे. इतकं धन घेऊन मी काय करणार!’
त्याचं म्हणणं ऐकलं आणि तो केवळ महान कलाकारच नव्हे तर एक महान व्यक्ती असल्याबद्दल राजाची खात्री पटली. 

Tuesday, May 15, 2012

जगाचं कल्याण हाच खरा धर्म

-संध्या पेडणेकर
रामानुजाचार्यांना त्यांच्या गुरुंनी अष्टाक्षरी मंत्राचा उपदेश दिला आणि सांगितलं, वत्सा, हा कल्याणकारी मंत्र ज्याच्या कानावर पडेल त्याची सारी पापं नष्ट होतात. तयाला मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच हा मंत्र अतिशय गुप्त राखला जातो. तू सुद्धा हा मंत्र कुणा अनधिकारी व्यक्तीच्या कानांवर जाणार नाही याबद्दल खबरदारी घे.
गुरुंचं बोलणं ऐकून रामानुज पेचात अडकले.
त्यांना वाटलं, हा मंत्र एवढा प्रभावशाली आहे तर तो गुप्त का ठेवायचा? हा तर प्रत्योक प्राणीमात्राला ऐकवायला हवा. त्यामुळे सगळ्यांच्या दुःखाचं हरण होईल. आणि सगळ्यांचीच पापं नष्ट होतील.
हा विचार मनात आला आणि लगेच त्यांना गुरुजींनी दिलेली ताकीदही आठवली. गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करणं म्हणजे महत्पापच.
या द्विधा मनःस्थितीमुळे त्यांना रात्रभर झोप आली नाही.
एका बाजूला संपूर्ण जगाचा उद्धार करण्याची संधी होती आणि दुसर्‍या बाजूला गुरुंची आज्ञा मोडण्याचं पातक होतं.
शेवटी त्यांनी निर्णय घेतला. ब्रह्म मुहूर्तावर ते उठले आणि आश्रमाच्या छतावर चढले. संपूर्ण शक्ती आपल्या आवाजात ओतून त्यांनी अष्टाक्षरी मंत्राचा जप सुरू केला.
छतावर चढून मंत्रजाप करणार्‍या रामानुजांना पाहाण्यास तिथे खूप गर्दी लोटली.
थोड्याच वेळात गुरुही तिथे येऊन पोहोचले.
रामानुजाला त्यांनी खाली उतरण्यास सांगितलं. रामानुज खाली आले.
गुरुंनी त्यांना विचारलं, 'तू काय करतोयस हे तुला कळतंय का?'
रामानुजंनी विनम्रपणानं सांगितलं, 'गुरुदेव, क्षमा असावी. आपल्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं पाप मी केलंय. हे पाप केल्यानं मी नरकात जाणार हे ही मला ठाऊक आहे. पण याबद्दल मला वाईट अजिबात वाटत नाहीय. ज्या ज्या लोकांच्या कानांवर हा मंत्र पडला त्या सगळ्यांनाच आता मोक्ष मिळेल.' रामानुजांनी दिलेली प्रांजळ कबूली ऐकून रागावलेल्या गुरुजींचं मन थंडावलं. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रु दाटले.
रामानुजाला छातीशी कवटाळत ते म्हणाले, 'तूच माझा खरा शिष्य आहेस. ज्याला संपूर्ण ् प्राणीमात्रांच्या कल्याणाची चिंता वाटते, तोच खरा धार्मिक.'
---

Thursday, May 10, 2012

मडक्याचा मोह तरी का बाळगा?

-संध्या पेडणेकर
बुखारातील शेख वाजिद अली एकदा आपला काफिला घेऊन प्रवासाला निघाले. त्यांच्या काफिल्यात जवळ जवळ हजारभर उंट होते. इतरही लवाजमा होता। सामान-सुमान होतं.
प्रवास करता करता ते एका अतिशय चिंचोळ्या मार्गावर पोहोचले. मार्ग एवढा चिंचोळा की एका वेळी फक्त एकच उंट त्या मार्गाने जाऊ शके. त्यामुळे त्यांच्या सगळ्या उंटांना एकामागे एक चालावं लागलं आणि उंटांची एक मोठ्ठी रांग तयार झाली. सगळ्यात पुढे असलेल्या उंटावर स्वतः शेख स्वार होते.
उंटांचा हा तांडा पुढे पुढे चालला होता आणि अचानक एक ऊंट मेला. पूर्ण रस्ता अडवून त्या उंटाचं कलेवर अशा रीतीनं पडलं की मागले उंट पुढे जाऊ शकत नव्हते आणि पुढले उंट मागे येऊ शकत नव्हते. शेखपर्यंत बातमी पोहोचली तसा तो मेलेल्या उंटाला काय झालं ते पाहायला आला. 
उंटाला पाहिलं आणि तो म्हणाला, 'हा मेला? याचे तर चारही पाय आहेत, पोट आहे, कान आहेत, शेपटीसुद्धा आहे!'
शेखसाहेबांना मृत्यूबद्दल माहिती नव्हती हे स्पष्टच होतं. सेवक त्यांना म्हणाला, 'हो, सगळं आहे खरं, पण त्याच्या आत असणारं जीवन संपलं.'
'म्हणजे आता हा उठून पुन्हा चालणारच नाही?' थोडंसं अविश्वासानं शेखनं विचारलं. 
सेवक म्हणाला, 'मालक, आता हा पुन्हा कधीही चालणार नाही. याचे प्राण उडाले. आता यानंतर त्याचं शरीर सडेल... आणि मरण फक्त उंटालाच येतं असंही नव्हे. मरण सगळ्यांनाच येतं.'
शेखनं विचारलं, 'मलाही मरण येईल?'
सेवक म्हणाला, 'हो.'
धक्का फार मोठा होता. त्यातून शेख सावरू शकला नाही. त्यानं आपल्यासोबतचं सगळं सामानं माघारी पाठवलं. मातीचं एक मडकं फक्त स्वतःजवळ ठेवलं. त्याच मडक्यात तो स्वतःचं जेवण शिजवत असे आणि झोपताना ते मडकं तो डोक्याखाली उशीसारखं घेत असे. 
एकदा एका कुत्र्याला त्या मडक्यात खाण्याचा वास आला आणि त्यानं त्यात तोंड घातलं. कुत्र्याचं तोंड मडक्यात अडकलं. काही केल्या बाहेर निघेना. बावचळलेला कुत्रा डोकं झटकत फिरू लागला आणि जवळच्या एका भिंतीवर मडक्यासह त्याचं डोकं आपटलं. मडक्यातून डोकं मुक्त झालं पण मडकं फुटलं. 
वाजिद अलींच्या मनात आलं, 'चला, आता यातूनही सुटलो. सगळ्या गोष्टींचा त्याग केला पण या मडक्याचा मोह काही सुटत नव्हता. ज्या शरीराला शेवटी दफनच करायचं त्यासाठी मडक्याचा मोह तरी का बाळगा?'
--- 

Tuesday, May 8, 2012

गुरुमहात्म्य


-संध्या पेडणेकर
एकदा कौटिल्यांकडे एक तरुण आला. कौटिल्यांना तो म्हणाला, आपण महान अर्थशास्त्री आहात असं ऐकून मी आलो. कृपया मला श्रीमंत व्हायचं आहे. मला यासाठी काही धडे द्या.
कौटिल्य त्याला म्हणाले, या जगात दोन प्रकारचे ज्ञान आहे– लौकिक आणि आध्यात्मिक. तुला ज्या प्रकारच्या ज्ञानाची गरज अहे त्या प्रकारचं ज्ञान मी तुला देईन. पण त्यासाठी तुला आधी एक परीक्षा द्यावी लागेल.  
परीक्षा देण्यासाठी तो तरुण तयार झाला. कौटिल्य त्याला म्हणाले, आसपासच्या रेतीतून पांढरा आणि काळा असे दोन प्रकारचे गोटे निवड आणि तुझ्या झोळीत ठेव. माझा एक शिष्य न पाहाता तुझ्या झोळीतून एक गोटा निवडेल आणि त्यावरून तुला कशाप्रकारच्या ज्ञानदानाची गरज आहे ते मी ठरवेन. त्याने जर पांढरा गोटा काढला तर मी तुला धन-संपत्ती कमावण्याबद्दलचं ज्ञान देईन आणि जर त्याच्या हाती काळा गोटा लागला तर तुला मी आध्यात्मिक ज्ञान देईन.
त्या तरुणानं लगेच खाली वाकून वाळूतून दोन गोटे निवडले आणि ते आपल्या झोळीत ठेवले. कौटिल्यांचं आणि त्यांच्या एका शिष्याचं त्या तरुणाकडे लक्ष होतं. त्यानं दोन्ही पांढरे गोटेच निवडले हे त्यांच्या लक्षात आलं. त्या तरुणाला धन कमवण्यातच रस आहे हे त्यांनी जाणलं.
ज्या शिष्यानं त्या तरुणाने निवडलेले गोटे पाहिले होते त्याला कौटिल्यांनी बोलावलं आणि त्या तरुणाच्या झोळीतून एक गोटा काढून आणण्यास सांगितलं. शिष्यानं त्या तरुणाच्या झोळीत हात घातला आणि एक गोटा हातात घेऊन मूठ बंद केली आणि हात बाहेर काढला. मूठ बंद ठेवूनच तो गुरुंच्या दिशेनं निघाला. पण चालता चालता त्याला ठेच लागली आणि तो पडला. त्याची मूठ उघडली आणि त्यातील गोटा वाळूत अदृश्य झाला. आता तो पुन्हा शोधणं शक्य नव्हतं.
तो तरुण घाबरला. त्याला वाटलं आता आपलं बिंग फुटणार.
पण कौटिल्य त्याला म्हणाले, घाबरू नकोस. आपण तुझ्या पिशवीतला गोटा काढून पाहू आणि माझ्या शिष्यानं उचललेला दुसरा गोटा कोणत्या रंगाचा होता ते ठरवू.
त्या तरुणाच्या झोळीतून पांढर्‍या रंगाचा गोटा निघाला. 
कौटिल्य म्हणाले, याचा अर्थ माझ्या शिष्यानं काळ्या रंगाचा गोटा उचलला होता, म्हणजे तुला आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. ठीक आहे, आजपासून तू माझा शिष्य झालास.
त्या तरुणाच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. धावत जाऊन त्यानं कौटिल्यांचे पाय धरले. आपल्या हातून घडलेल्या चुकीबद्दल सांगितलं. माफी मागितली.
कौटिल्य त्याला म्हणाले,
आपल्या शिष्याला खरोखर कोणत्या गोष्टीची गरज आहे ते सच्चा गुरु जाणतो.