Wednesday, December 11, 2013

देवाची भेट

-संध्या पेडणेकर
पंजाबातील संत बुल्लेशाह यांनी एका माळ्याला आपला गुरु मानलं होतं.
बुल्लेशाह यांचं मूळ नाव अब्दुल्ला शाह होतं. अरबी, फारसी आणि कुराण यांचं उत्तम ज्ञान असल्याऱ्या त्यांच्या वडिलांना लोक आदरानं दरवेश मानायचे. ते एका मशीदीचे मौलवी होते. बुल्ले शाह यांचं शिक्षण ख्यातनाम गुरु हजरत गुलाम मुर्तजांकडे झालं. पण परमात्म्याच्या दर्शनाच्या ओढीनं त्यांना हजरत इनायत शाह कादरी यांच्यापर्यंत आणून पोहोचवलं. हजरत इनायत शाह जातीनं माळी होते. बुल्ले शाहांच्या घरातील लोक त्यांनी निम्न जातीच्या व्यक्तीला गुरु मानलं याबद्दल नाराज होते. पण बुल्ले शाह यांना त्याची पर्वा नव्हती. ईशसाधना हेच त्यांच्या जीवनाचं इतिकर्तव्य होऊन बसलं होतं.
बुल्ले शाह एकदा आपल्या गुरुंना भेटायला गेले. त्यावेळी त्यांचे गुरु बागेत काम करत होते. बुल्ले शाहनी त्यांना विचारलं, परमात्म्याच्या प्राप्तीचा काही उपाय सांगा.
आपल्या कामात गर्क असलेल्या गुरुंनी त्यांच्याकडे वळूनही न पाहाता म्हटलं,
"बुल्लिहआ रब दा की पौणा| एधरों पुटणा ते ओधर लाउणा|"
म्हणजे- परमात्म्याची भेट हवी तर करायचं काय, तर - इकडचं उपटा न् तिकडे लावा, बस।
थोडा वेळ विचार केल्यानंतर बुल्ले शाह म्हणाले, मला समजलं नाही.
गुरुंनी त्यांना विचारलं, देव कुठे असतो ते सांग. 

बुल्ले शाह म्हणाले, वर,  आकाशात.
गुरु त्यांना म्हणाले, मग उपट आकाशातून देवाला आणि लाव आपल्या हृदयात. आपल्या हृदयातील मीपणाचा भाव उपट आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये त्याची रोपणी कर. म्हणजे, सगळ्यांमध्ये तुला आपण स्वतःच असल्याचं जाणवेल. आपल्या हृदयात एव्हढं प्रेम निर्माण कर की सर्व जीवांमध्ये तुला स्वतः असल्याचं जाणवू दे.
---
हिंसेचं उत्तर हिंसा नव्हे ही बुल्ले शाह यांची प्रमुख शिकवण. यू ट्यूब वर बुल्ले शाह यांच्या काही प्रसिद्ध गाण्याच्या लिंक अशा-

Saturday, November 16, 2013

खरा ज्ञानी

©संध्या पेडणेकर
जनक राजानं एकदा पंडितांची सभा बोलावली. सभेत जगातील रथी-महारथींना बोलाविण्यात आलं. त्यांच्या चर्चेतून अंतिम सत्याबद्दल निर्णय व्हावा हा त्याचा हेतू होता. सत्याचं जो उत्तमरीत्या निरूपण करेल त्याला मुक्त हस्ते धन-धान्य दान देण्यात येईल अशी राजानं घोषणा केली होती. अपेक्षेनुसार चर्चेत भाग घेण्यासाठी दूरवरून विद्वान मंडळी आली.
अष्टावक्रला या सभेचं आमंत्रण नव्हतं. त्याच्या पित्याला मात्र आमंत्रण मिळालेलं होतं. त्यानुसार ते सभेत उपस्थितही झाले होते.
अचानक काही काम उद्भवल्यामुळे पित्याला बोलाविण्यासाठी अष्टावक्रला दरबारात जावं लागलं.
शरीराला आठ ठिकाणी बांक असलेल्या अष्टावक्रानं जेव्हा सभेत प्रवेश केला तेव्हा त्याला पाहून उपस्थित विद्वान मंडळींमध्ये हास्याचा लोट उसळला. काही जण त्याची टिंगल-टवाळीही करू लागले. सगळेच अष्टावक्रला पाहून हसू लागले. त्यांना असे हसताना पाहून अष्टावक्रही गदगदून हसू लागला. मात्र तो जेव्हा हसू लागला तेव्हा सारे चूप झाले. अष्टावक्र का हसतोय हे कुणाच्याच ध्यानात येईना.
जनक राजानं अष्टावक्रला विचारलं, हे लोक कशासाठी हसतायत हे मी समजू शकतो पण तू कशासाठी हसतोयस ते काही माझ्या ध्यानात येत नाहीय.
अष्टावक्र म्हणाला, आपण पंडित किंवा ज्ञानी लोकांऐवजी चांभारांना सभेत बोलावलंत हे लक्षात येऊन मी हसलो. या सगळ्यांना शरीर आणि चामडीच दिसते म्हणजे ते चांभारच नव्हेत का? राजन्, आपण यांच्याकडून परमज्ञान किंवा परम सत्याची अपेक्षा करताय म्हणजे वाळूचे कण रगडून तेलाची अपेक्षा करताय. आपणास खरंच सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपण माझ्यापाशी यावं.

त्यानंतर राजा जनकाने अष्टावक्राला अनेक प्रश्न विचारले, जिज्ञासा प्रकट केल्या आणि अष्टावक्र ने त्यांचं निरसन केलं. जनक आणि अष्टावक्र यांच्यातील संवाद महागीता किंवा अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानमार्गावरील तो अत्यंत तर्कपूर्ण आणि स्पष्ट ग्रंथ मानला जातो. 

Tuesday, November 12, 2013

नेपोलियनचे प्रशंसक

©संध्या पेडणेकर
पॅरिसमधील एका बागेत सुंदर शुभ्र घोड्यावर बसलेल्या नेपोलियनचा पुतळा होता.

त्या बागेजवळच्या परिसरातील एका घरात एक पिता-पुत्र रहात असत.
ते नियमानं रोज त्या बागेत फेरफटका मारण्यासाठी येत.
बागेत आले की नेपोलियनच्या पुतळ्यासमोर बाप-लेक दोघांचीही पावले थबकत.
बाप-लेक दोघेही पुतळ्याकडे पाहात काही वेळ घालवत. मग घराकडे परतत.
बापाला वाटे, नेपोलियनच्या उमद्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव आपल्या मुलावर पडला तर उत्तमच आहे.
होता होता एके दिवशी त्यांची पॅरिसहून दुसऱ्या शहरात बदली झाली.
त्याला आणि मुलाला दोघांनाही या गोष्टीचं फार वाईट वाटलं की आता आपल्याला रोज रोज नेपोलियनला पाहाता येणार नाही.
निघण्याआधी एकदा शेवटचं म्हणून नेपोलियनच्या त्या पुतळ्याचं दर्शन घ्यायला दोघे आले.
बराच वेळ टक लावून पाहात राहिले.
मग मुलगा भारावलेल्या आवाजात म्हणाला, किती सुंदर पुतळा आहे हा बाबा, नेपोलियन खरंच खूप उमदा होता. पहायला हवं होतं त्याला जिवंतपणी. पण बाबा, हा त्याच्या पाठीवर बसलेला इसम कोण?!
:-)

Friday, September 20, 2013

सत्यवादी सॉक्रेटीस

©संध्या पेडणेकर.
सॉक्रेटीस नावाचा एक ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला. सत्य बोलल्याबद्दल त्याला विष दोऊन ठार मारण्यात आलं. खरं बोलणं हाच केवळ त्याचा अपराध होता. त्यानं राज्याविरुद्ध बंडाळी केली नव्हती. तो क्रांतीकारकही नव्हता. म्हणजे क्रांती करून राज्य उलथून टाकण्याचाही त्याचा प्रयत्न नव्हता. त्याचं लोकांना फक्त एव्हढंच सांगणं होतं की बाबांनो, खोट्याची कास नका धरू. खोट्याचाच राजमार्ग असणाऱ्या शहरात कुणाला सहन होणार हे
? न्यायालयात त्याच्यावर खटला गुदरला गेला, तो पटपट चालला आणि त्याला वीष देऊन ठार मारण्याची शिक्षा मिळाली. कोणतीही चालढकल न करता ती लागलीच अमलातही आणली गेली.
पण मनं सगळ्यांचीच निर्ढावलेली नसतात. सॉक्रेटीसचा शिष्यवर्ग होता. समाजातील काही लोकही त्याच्या बाजूनं होते. अर्थातच षंढ सहानुभूती कधी कुणाच्या उपयोगी पडत नसते. तशी या लोकांची सहानुभूतीही सॉक्रेटीसच्या कामी आली नाही. त्याला मुख्य न्यायाधीशानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. व्यवस्थेचा तो पाईक होता तरी निरपराध व्यक्तीला मृत्युदंड ठोठावताना त्याला अपराधी वाटत होतं. नाइलाज होता त्याचा कारण ज्यूरींचं बहुमत सॉक्रेटीसच्या विरोधात होतं. तरीही, आपल्या अधिकाराचा वापर करत मुख्य न्यायाधीशानं एक मार्ग काढला. तो सॉक्रेटीसला म्हणाला,
मी विनंती करतो की अथेन्स सोडून कायमचे निघून जायला तयार असाल तर आम्ही आपणास कोणताही दंड देणार नाही. अथेन्स सोडून निघून गेल्यानंतर आपणास जे वाटेल ते करायला आपण स्वतंत्र असाल, याबाबत अथेन्सवासियांची कोणतीही हरकत नसेल.
सॉक्रेटीस त्यांना म्हणाला, मी जिथे जाईन तिथे माझ्यावर खटला चालवला जाईल. सत्य जिथे जाईल तिथे लोक दुखावतीलच. अथेन्ससारख्या सुसंस्कृत शहरात सत्य जर असह्य होत असेल इतर कुठे ते सुसह्य ठरेल याची शक्यता नाही.
मुख्य न्यायाधीशांनी त्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न करत म्हटलं, मग असं करा, आपण अथेन्समध्येच रहा. म्हातारपणात आपणास आम्ही अथेन्सबाहेर काढू इच्छीत नाही. पण सत्य बोलणं बंद करा.

यावर सॉक्रेटीस म्हणाला, हे तर आणखी कठिण आहे. नव्हे अशक्य आहे. मी जगू शकणार नाही. सत्य माझा श्वास आहे. श्वास घेतल्याशिवाय कुणी जगू शकत नाही तद्वत मी सत्याची कास सोडू शकत नाही. जीवन उरो किंवा जावो, सत्याशिवाय त्याचं काय मोल? आपण मृत्युदंड ठोठवावा हेच माझ्यासाठी उत्तम ठरेल. ऩिदान लोक म्हणतील तरी की- त्यानं कोणतीही तडजोड स्वीकारली नाही, सत्यासाठी सॉक्रेटीस मेला. 
-------------- 
Painting - 'Death Of Socrates'
http://en.wikipedia.org/wiki/Trial_of_Socrates
http://en.wikipedia.org/wiki/Socrates

Friday, September 6, 2013

प्रेम जागवा

-संध्या पेडणेकर
जगातल्या प्रसिद्ध महिला संतांमध्ये सूफी संत राबियाचंही नाव येतं.
एकदा राबियाच्या घरी एक फकीर मुक्कामाला होता. धर्मग्रंथ वाचत असताना राबियानं एक ओळ पुसली हे त्यानं पाहिलं.
त्याला मोठं आश्चर्य वाटलं. धर्मग्रंथासारख्या पवित्र रचनेमध्ये राबिया खाडाखोड कशी काय करते?
त्यानं हा प्रश्न राबियाला विचारला.
राबियानं पुसलेली ओळ होती - सैतानाबद्दल घृणा बाळगा.
राबिया त्या फकीराला म्हणाली, "माझ्या मनात  परमात्म्याविषयी प्रेम जागं झालं आणि त्या प्रेमानं माझ्या मनाचा संपूर्ण पसारा व्यापला. आता माझ्या मनात घृणेसाठी जागाच नाही.
बहुधा असंच होत असावं. मनात परमात्म्याविषयी प्रेम जागं झालं की कुणाहीबद्दल घृणा बाळगता येतच नाही - अगदी सैतानाबद्द्द्लसुद्धा! त्यामुळे धर्मग्रंथातली ही ओळ मला अनावश्यक वाटली आणि म्हणून मी ती खोडली"

Saturday, August 10, 2013

पहिल्यांदा करण्याचं महत्व

-संध्या पेडणेकर
अमेरिकेचा शोध लावल्यानंतर कोलंबस मायदेशी परतला. 
राणीनं त्याचं भव्य स्वागत केलं. 
राजदरबारात त्याच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केला. 
काही दरबारी कोलंबसचे घोर विरोधक होते. त्यांना अर्थातच हे आवडलं नाही. 
समारंभ सुरू असताना त्यांच्यापैकी काही म्हणाले, 'कोलंबसने काही खास कामगिरी बजावलीय असं आम्हाला वाटत नाही. पृथ्वी गोल आहे. कुणीही जरी गेलं असतं तरी त्याला अमेरिका मिळाली असतीच.'
बराच वेळ कोलंबस त्यांचे टोमणे ऐकत राहिला.
शेवटी समोरच्या थाळीत खाण्यासाठी ठेवलेल्या उकडलेल्या अंड्यांपैकी एक अंडं उचललं आणि तो म्हणाला, 'आपल्यापैकी कुणी हे अंडं टेबलावर सरळ उभं करून दाखवू शकेल का?'
कोलंबसने विचारल्यावर त्याच्या सगळ्या विरोधकांनी अंडं टेबलावर सरळ उभं करणं एक आव्हान समजून स्वीकारलं. पटापट थाळीतील अंडी उचलून ते प्रयत्नाला लागले.
पण कुणालाही अंडं टेबलावर उभं करता येईना.
शेवटी ते म्हणाले, "अंडं टेबलावर सरळ उभं राहूच शकत नाही. "
हसतच कोलंबसनं एक अंडं उचललं आणि जोरात टेबलावर आपटलं. त्यामुळे अंड्याच्या बुडाकडचा भाग चेपला आणि अंडं सरळ उभं राहिलं.
कोलंबस म्हणाला, "पाहा, मी अंडं उभं केलं."
यावर सगळेच दरबारी गलका करत म्हणू लागले, 'तू अंडं चेपवलंस. असं तर कुणीही अंडं उभं करू शकेल.'
कोलंबस म्हणाला, "पण कुणी केलं का? एकदा कुणी करून दाखवल्यानंतर करणं सोपं असतं. पहिल्यांदा कोण करतं यालाच महत्व असतं."

Monday, August 5, 2013

श्रीमती रूथ

-संध्या पेडणेकर
खलील जिब्रान यांची आणखी एक कथा –
एकदा तिघे पुरुष भ्रमण करत निघाले असता त्यांना दूर टेकडीवर एक सुंदर महाल दिसला.
लगेच त्यापैकी एक म्हणाला,  तुम्हाला ठाऊक आहे का, त्या महालात श्रीमती रूथ रहाते. चेटकीण आहे ती.
दुसरा म्हणाला, ते घर श्रीमती रूथचंच आहे पण तिच्याबद्दल तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे बरं. अहो, ती चेटकीण नाही एक सुंदर स्त्री आहे. अगदी स्वप्नाळू... नेहमी आपल्या स्वप्नांत चूर असते ती.
तिसरा म्हणाला – सुंदर आहेच पण मी असंही ऐकलंय की ती खूप क्रूर, कठोर आणि पाषाणहृदयी आहे. ही आसपासची सगळी जमीन तिचीच आहे. या जमिनीवर राबणाऱ्या कुळांचं ती अक्षरशः रक्त शोषून घेते म्हणे.
बोलता बोलता ते गावात पोहोचले. 
समोरून एक म्हातारा येत असलेला त्यांना दिसला. 
त्याला यांनी विचारलं, काहो बाबा, त्या टेकडीवरल्या महालात कोणी श्रीमती रूथ रहाते तिच्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का?”
म्हाताऱ्यानं तिघांकडे पाहिलं न् मग म्हणाला, हो, श्रीमती रूथ तिथे रहायच्या. म्हणजे, मी आता नव्वद वर्षांचा आहे. माझ्या लहानपणी मी त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. पण मी साधारण दहाएक वर्षांचा असेन तेव्हाच त्या वारल्या. तेव्हापासून हा त्यांचा महाल अगदी ओसाड पडलाय. फक्त घुबडं घुमतात तिथे. काही लोक म्हणतात की तेथे भुतं रहातात.

Saturday, August 3, 2013

रोग जाणून उपचार करा

-संध्या पेडणेकर
एकच उपचार सगळ्यांवर लागू होत नसतो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि प्रकृतीनुसार केलेले उपचारच रोगापासून मुक्ती मिळवून देतात. प्रकृतीविरुद्ध केलेले उपचार घातक ठरण्याचीही शक्यता असते. आजी एक गोष्ट सांगायची -
गणेश नावाच्या एका व्यक्तीच्या पोटात एके दिवशी अचानक खूप दुखू लागलं. वेदना असह्य झाल्या तेव्हा तो गावच्या वैद्याकडे गेला. वैद्यानं त्याला तपासलं पण नेमकं काय झालंय हे काही त्याला कळलं नाही. त्यानं गणेशाला तसं सांगितलं. म्हणाला - 'माफ कर बाळा मला, पण तुझ्या पोटात नेमकं कशामुळे दुखतंय हे काही माझ्या लक्षात येत नाहीय. मी तुझ्यावर उपचार करू शकत नाही.'
आधीच गणेश पोटदुखीनं हैराण झालेला होता. वैद्यबुवा नेमके काय म्हणाले हे त्याच्या लक्षात आलं नाही. अनुमानानं त्यानं आपल्यापरीनं अर्थ लावला की आपल्याला झालेल्या दुखण्यावर उपचार नाहीत! दुःखी मनानं तो घरी परतला.
त्याला कांद्याचं लोणचं खूप आवडायचं. त्याला वाटलं, एवीतेवी आपण आता मरणारच आहोत, तर निदान पोटभर कांद्याचं लोणचं खाऊन तरी मरू. त्यानं लोणच्याची बरणी शेजारी ठेवली, वाडगाभर लोणचं काढून घेतलं आणि खायला सुरवात केली. हां हां म्हणता त्यानं  बायकोनं वर्षभरासाठी करून ठेवलेलं लोणचं फस्त केलं.
आश्चर्य म्हणजे, लोणचं खाता खाता त्याची पोटदुखी थांबली केव्हा त्याला कळलंसुद्धा नाही.
दोन-तीन दिवसांनी वैद्यबुवांना गणेशच्या पोटदुखीची आठवण आली. ते गणेशला भेटले. गणेशची तब्बेत उत्तम असून तो कामात गुंतलेला आहे हे पाहून वैद्यबुवांना बरं वाटलं. त्यांनी विचारलं तेव्हा गणेशानं त्यांना कांद्याच्या लोणच्याची महिमा सांगितली. वैद्यबुवांना वाटलं, म्हणजे कारण लक्षात न आलेल्या पोटदुखीवर कांद्याचं लोणचं हा उपचार ठरू शकतो.
काही दिवसांनी वैद्यबुवांकडे राजेश पोटदुखीची तक्रार घेऊन आला. वैद्यबुवांनी त्याला तपासलं पण रोगाचं निदान त्यांना करता आलं नाही. त्यांनी राजेशला सांगितलं, एक किलो कांद्याचं लोणचं खरेदी कर आणि खा.
राजेशनं कांद्याचं लोणचं खरेदी केलं आणि खायला घेतलं.
थोडं लोणचं खाल्लं आणि त्याला पोटदुखीची असह्य उबळ आली.
वैद्यबुवांवर राजेशचा पूर्ण विश्वास होता. पोटदुखी सहन करूनही तो लोणचं खात राहिला. आणखी थोडं लोणचं खाल्लं आणि त्याची पोटदुखी शिगेला पोहोचली. शेवटी तो पोटदुखीनं मेला.
---   ---   ---   ---   ---   ---   ---   ---

Friday, March 29, 2013

नहि सत्यात्परो धर्मः!


-संध्या पेडणेकर
एकदा बरेचसे ब्राह्मण तत्वज्ञानी गौतमाला भेटायला आले. गौतमाच्या शिष्यांनी आपल्या गुरूला सांगितले,'आपल्या भेटीच्या अपेक्षेने ब्रह्मवादी तत्वज्ञानी आलेले आहेत. त्यांनी एक नवीन तत्वज्ञान स्थापित केलेले आहे. आणि या तत्वज्ञानातील मुख्य देव म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे.  गुरुजी, आपणाला याविषयी काय सांगावयाचे आहे ते जाणण्याची आम्हा सार्‍यांची इच्छा आहे.'
गौतमांनी यावर जे उत्तर दिलं ते अत्यंत विचारार्ह आहे असे मला वाटते. गौतमांनी या ब्रह्मवाद्यांना प्रश्न केला, 'तुम्ही ब्रह्म पाहिले आहे का?'
उत्तर मिळाले, 'नाही.'
गौतमांनी विचारले, 'तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहे का?'
पुन्हा उत्तर होते, 'नाही.'
गौतमांचा पुढचा प्रश्न होता, 'तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले तरी आहे का?'
त्यांचे उत्तर तेच होते, 'नाही.'
गौतमांनी विचारले, 'तुम्ही ब्रह्माची चव घेऊन पाहिली आहे का?'
उत्तर होते, 'नाही.'
यावर गौतम ब्रह्मवाद्यांन्या म्हणाले, 'तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी व पंचकर्मेंद्रियांनी ब्रह्म काय आहे हे अनुभवले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे हे तरी तुम्ही कशावरून म्हणता?' यावर ब्रह्मवाद्यांना काही उत्तर देता आले नाही.
डॉ बाबासाहब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, 243.
वडाला, मुंबई येथील सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षिक समारंभ प्रसंगी दिलेल्या वक्तव्यातून.