Tuesday, January 31, 2012

कंदिलाची किमया

-संध्या पेडणेकर
एका गावात एक माणूस रहायचा. त्याच्या घरापासून जवळच एक पर्वत होता. जवळ जाऊन, फिरून तो पर्वत पाहायची त्या माणसाची खूप इच्छा होती. कारण तो पर्वत यात्रेकरूंची इच्छा पूर्ण करतो अशी ख्याती होती. खूप दूरवरून लोक खास त्या पर्वताची यात्रा करण्यासाठी येत असत.
या माणसाच्या घरापासून तो पर्वत जवळच होता. फक्त 15 मैलांच्या अंतरावर. मनात आणलं तर सकाळी निघून तो संध्याकाळी घरी परतू शकला असता. पण जाऊ कधीतरी अशा विचारानं त्याचं जाणं नेहमी टळत गेलं. मग त्याला वाटू लागलं की, अशानं ज्या पर्वताची यात्रा करण्यासाठी लोक दूरवरून येतात त्या पर्वताची यात्रा आपण त्याच्या इतक्या जवळ असूनही कधीही करू शकणार नाही.
शेवटी एकदा त्यानं निर्धार केला. आज रात्री आपण पर्वतावर जायचंच.
रात्री सारी कामं आटोपल्यावर त्यानं कंदील पेटवला आणि तो घेऊन यात्रेला निघाला.
गावाबाहेर येता येता त्याच्या मनात विचार आला - आपल्याला पंधरा मैल चालायचंय. या कंदिलाचा उजेड जेमतेम चार पावलांपर्यंत जातोय. अशा गडद अंधारात, एवढ्याशा कंदिलाच्या प्रकाशात आपण कुठवर पोहोचू शकू? आपण या अंधारात गडप होऊन जाऊ. हा विचार मनात आला आणि तो एवढा निराश झाला हातातील कंदील शेजारी ठेवून त्यानं जमिनीवर बसकण मारली.
काय करावं त्याला काही सुचेना. तेवढ्यात त्याला एक साधू त्या मार्गानं येताना दिसला. जवळ आल्यावर साधूनं त्या माणसाला विचारलं, 'काय झालं? तू अगदी निराश झालेला दिसतोयस.' तो माणूस म्हणाला, 'मी अभागी आहे हेच खरं. कित्येक वर्षांपासून या पर्वताची यात्रा करायची ठरवत होतो पण कधी घरातून निघायची सवडच झाली नाही. आज शेवटी निर्धारानं निघालो तर माझ्या या कंदिलानं दगा दिला. एव्हढासा कंदील, त्यातून प्रकाशही किती मंद निघतोय.'
साधू त्याला म्हणाला, 'तू माझ्याबरोबर चल.'
तो मग साधूसोबत निघाला.
पाहातो तर काय, प्रकाशही त्याच्यासोबत पुढे चालला होता. जसजसा तो पुढे जायचा तसतसा प्रकाशही पुढे पुढे सरकायचा. त्याच्या वाटेवरील अंधार सरला होता. त्यानं साधूचे आभार मानले.
साधू म्हणाला, 'सरळ सोपी गोष्ट आहे. तू चार पावलं चाललास की उजेडही चार पावलं पुढे चालेल. बसल्याठिकाणी हिशोब लावत राहिलास तर हाती काहीही यायचं नाही. अरे वेड्या, पंधरा मैलच काय, या कंदिलाच्या प्रकाशात तू हजारो मैलांचं अंतर सुखेनैव कापू शकतोस.'
---

Monday, January 30, 2012

ब्रह्मर्षी विश्वामित्र

विश्वामित्र स्वतःला ब्रह्मर्षी म्हणवून  घेऊ इच्छीत होते पण वशिष्ठ मुनी त्यांना नेहमी राजर्षीच म्हणायचे. वशिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हटल्याशिवाय लोक त्यांना ब्रह्मर्षी कसे म्हणणार? वशिष्ठांकडून मान्यता मिळेपर्यंत लोकही विश्वामित्रांना ब्रह्मर्षी मानायला तयार नव्हते. त्यामुळे तेढ वाढतच गेली. गोष्ट इतक्या गंभीर थराला गेली की एक दिवस विश्वामित्र तलवार घेऊन ब्रह्मर्षींच्या आश्रमात पोहोचले. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच असा त्यांनी पक्का निर्धार केला होता. आज वशिष्ठांनी आपल्याला जर ब्रह्मर्षी म्हटलं नाही तर, त्यांची मान धडावेगळी करायचा निर्णयच त्यांनी घेतला होता.
वशिष्ठ विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणायला तयार नव्हते कारण त्यांना वाटे की, विश्वामित्राच्या मनात आपल्या तपस्येबद्दल गर्वाची भावना आहे.
विश्वामित्र जेव्हा वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा वशिष्ठ मुनी आणि त्यांच्या  शिष्यांमध्ये चर्चा चाललेली होती.  विश्वामित्र जवळच्या झाडीत लपून बसले आणि संधीची वाट पाहू लागले. संधी मिळाली की वार करायचा असं त्यांनी ठरवलं होतं.
तेवढ्यात एका शिष्यानं  वशिष्ठांना  प्रश्न विचारला, 'विश्वामित्रांनी एवढी कठोर तपस्या केली तरी आपण त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही?' त्यावर वशिष्ठ म्हणाले, 'विश्वामित्र श्रेष्ठ तपस्वी आहेत यात शंकाच नाही. ते ब्रह्मर्षी होतील अशी मला आशा वाटतेही. पण म्हणून मी त्यांना आधीपासून ब्रह्मर्षी म्हणणार नाही. ते जेव्हा त्या पदाला पोहोचतील तेव्हाच मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणेन. अजूनही त्यांच्यात क्षत्रियाची घमेंड शिल्लक आहे. तलवार अजून त्यांच्या हातून सुटली नाहीय. ज्या दिवशी त्यांच्या हातून तलवार सुटेल त्या दिवशी मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणेन. मी काही त्यांचा दुस्वास करत नाही.'
गुरुशिष्यातील हा संवाद झाडीमागे लपलेल्या विश्वामित्रांनी ऐकला. वशिष्ठ आपल्याबद्दल इतक्या प्रेमानं बोलत असतील यावर त्यांचा विश्वासच बसेना.  त्यांच्या हातून तलवार गळून पडली. धावत जाऊन त्यांनी वशिष्ठांचे पाय पकडले. वशिष्ठांनी त्यांना उठवलं, म्हणाले, 'ब्रह्मर्षी, उठा!' वशिष्ठांच्या तोंडून आपल्यासाठी ब्रह्मर्षी शब्द ऐकून विश्वामित्रांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ते वशिष्ठांना म्हणाले, 'ब्रह्मर्षी म्हणवून घेण्यासाठी मी लायक नाही. आज मी काय करायला आलो होतो हे तुम्हाला माहीत नाही.' वशिष्ठ म्हणाले, 'तुम्ही काय करण्यासाठी आला होतात ते महत्वाचं नाही, तुम्ही काय केलंत हे महत्वाचं. अहंकार सोडून तुम्ही विनम्र झालात. अहंकाराचा पूर्णपणे त्याग करणं म्हणजे ब्राह्मण होणं. म्हणूनच आज मी तुम्हाला ब्रह्मर्षी म्हटलं.'
-संध्या पेडणेकर

Saturday, January 28, 2012

जीवनसंगीत

-संध्या पेडणेकर
राजकुमार श्रोणनं भगवान बुद्धांकडून दीक्षा घेतली आणि तो संन्यासी झाला. संन्यासी होण्याआधी त्यानं जीवनात कैक सुखं उपभोगली होती. भोगातच त्याचं जीवन गुरफटलेलं होतं. संन्यासी झाल्यानंतर मात्र त्यानं त्यागाची अति गाठली. इतर क्षिक्षु राजरस्यावरून चालले की कधीकाळी गालिच्यांवर चालणारा हा राजकुमार काट्यांनी भरलेल्या पायवाटेवरून चालू लागायचा. विश्रांतीसाठी इतर भिक्षु वृक्षांच्या सावलीत बसले की हा उन्हात उभा रहायचा.दिवसातून एकदा  इतर जेवत असतपण भिक्षु बनल्यानंतर श्रोण कित्येक दिवसपर्यंत उपाशीच रहायचा. सहा महिन्यांत तो अगदी सुकून गेला. अशा कठिण दिनचर्येमुळं त्यचा देहही काळवंडला.
एके दिवशी भगवान बुद्ध त्याला म्हणाले, 'श्रोण! मी असं ऐकलंय की राजकुमार  असताना तू वीणा वाजवायचास, अतिशय कुशल वीणावादक आहेस तू. खरंय का हे?' श्रोणनं उत्तर दिलं,'होय. लोक मला  म्हणायचे की तू सुरेख वीणा वाजवतोस.' बुद्ध श्रोणला म्हणाले, 'मग मला एक सांग, वीणेच्या तारा ढिल्या पडल्या तर त्यांचयातून झंकार उमटेल का?' श्रोण हसला, म्हणाला - 'नाही गुरुदेव. वीणेच्या तारा ढिल्या पडल्या तर त्यांच्यातून झंकार निघणारच नाही.' बुद्ध म्हणाले, 'आणि जर जास्त ताण असेल तर?' श्रोण म्हणाला, 'जास्त ताणलेल्या तारांमधूनही सगीत उमटत नाही. कारण अती ताणलेल्या तारा स्पर्श होताच तुटतात.' पुढे तो म्हणाला, 'संगीत निर्माण होण्यासाठी तारा ताणलेल्या किंवा ढिल्या असलेल्या चालत नाही....' त्याला मध्येच थांबवून भगवान बुद्ध  म्हणाले, 'वीणेचा नियम जीवनवीणेवरही लागू आहे, श्रोण. जीवनवीणेच्या तारा ताणलेल्या किंवा ढिल्या असतील तर संगीत निर्माण होत नाही. जीवनाचं संगीत अतीवर नव्हे, मध्यावरच - समेवरच साधता येतं.' ऐकलं आणि श्रोणला आपली चूक उमगली.
--------

Thursday, January 26, 2012

इप्सितसाध्यासाठी नेमकेपणा हवाच

-संध्या पेडणेकर
ईसाप एकदा असाच जाणार्‍या-येणार्‍यांकडे पाहात रस्त्याच्या कडेला बसला होता. एक माणूस त्याच्याजवळ आला आणि त्यानं ईसापला विचारलं, 'काहो, गावातलं मंदिर इथून कितीसं दूर आहे? मला जायचंय मंदिरात, पोचायला साधारण किती वेळ लागेल?' ईसापनं एकदा त्या माणसावर नजर टाकली आणि कपडे झटकत तो उठून उभा राहिला. यात्रेकरू संकोचला. त्याला वाटलं, उगाच आपण याला त्रास दिला. शिवाय, याची उत्तर देण्याची इच्छा आहे की नाही कुणास ठाऊक. काही बोलतच नाहीय हा.  तो चालू लागला. ईसापही त्याच्यासोबत चालू लागला. गोंधळलेला यात्रेकरू त्याला म्हणाला, 'अहो, मला सोबतीची गरज नाहीय. कशाला उगाच तसदी घेता. नुसतं सांगितलंत तरी चालेल.' ईसापने त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तो त्या यात्रेकरूसोबत चालत राहिला. पंधरा-एक मिनिटं चालल्यानंतर ईसापनं यात्रेकरूला थांबवलं. म्हणाला, 'तुम्हाला मंदिरापर्तयंत पोहोचायला साधारण पंधरा मिनिटं लागतील.'यात्रेकरूला वाटलं, विक्षिप्तच आहे वल्ली. तो म्हणाला, 'आपण हे मला तिथे बसल्या बसल्यासुद्धा सांगू शकला असतात. उगाच मैलभर पायपीट घडली आपल्याला.' ईसाप त्याला म्हणाला, 'बाबा रे, तुझअया चालण्याचा वेग मला जोवर ठाऊक नव्हता तोवर इप्सित स्थळी तू किती वेळात पोहोचणार हे मी कसा सांगणार?'
ध्येय कधी गाठणार हे तुम्ही त्याच्या दिशेनं किती वेगात निघाला आहात यावरच अवलंबून असतं.
---