Wednesday, November 14, 2012

विसोबा खेचर

-संध्या पेडणेकर
संत चरित्रांमध्ये विसोबांचे नाव विसोबा खेचर कसे पडले याबद्दल एका घटनेचा उल्लेख येतो.
आळंदीत रहाणार्‍या दुष्ट विसोबा ब्राह्मणाला ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाईबद्दल नेहमी द्वेष वाटायचा.
एकदा मुक्ताबाईला मांडे खायची इच्छा झाली.
मांडे बनविण्यासाठी मातीच्या तव्याची गरज होती. ज्ञानेश्वर तवा आणण्यासाठी कुंभाराकडे निघाले.
रस्त्यात त्यांना विसोबा भेटले. ज्ञानेश्वर कुंभाराकडे कशासाठी चालले आहेत हे कळले तेव्हा तेही त्यांच्यासोबत निघाले.
त्यांनी कुंभाराला ज्ञानेश्वरांना तवा देऊ दिला नाही.
दुखी मनाने ज्ञानेश्वर घरी परतले. मुक्ताबाईनं विचारलं, 'भांडं कुठाय?'
ज्ञानेश्वर तिला म्हणाले, 'तू तयारी कर, माझ्या पाठीवर मांडे भाज.'
तवा न मिळाल्याने घरी परतल्यानंतर होणारी भांडणे पाहाण्यासाठी ज्ञानेश्वरांमागोमाग विसोबासुद्धा येऊन लपून उभे होते.
मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे थापले, भाजले हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
हा चमत्कार पाहून विसोबा आमूलाग्र बदलले. पुढे येत त्यांनी ज्ञानेश्वरांचे पाय धरले आणि माफी मागितली.
तवा न मिळण्यामागे विसोबांचं कारस्थान होतं हे  मुक्ताबाईला समजलं. रागानं ती म्हणाली, 'दूर हो खेचरा! आधी तवा मिळू दिला नाहीस आणि आता मांडे बनू देणार नाहीस का?'
ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला शांत केलं. पण तेव्हापासून विसोबा झाले विसोबा खेचर. आजही त्यांना याच नावानं ओळखलं जातं.