Showing posts with label राजा. Show all posts
Showing posts with label राजा. Show all posts

Saturday, September 29, 2012

जैशी व्यक्ती तैशी सजा!

-संध्या पेडणेकर
एका राज्याच्या तीन अधिकार्‍यांनी राज्यकारभारात मोठा घोटाळा केला.
राजानं तिघांनाही बोलावलं.
त्यांच्यापैकी एकाला राजा म्हणाला, 'मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.'
दुसर्‍या व्यक्तीला राजानं एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
तिसर्‍या व्यक्तीला नगरातून धिंड काढून फटके लगावण्याची आणि वीस वर्षे कारावासाची शिक्षा फर्मावली.
दरबारी गोंधळले. एकाच गुन्ह्यासाठी तीन व्यक्तींना तीन प्रकारची शिक्षा?
त्यांनी बिचकत बिचकत राजाला विचारलं, 'एकाच अपराधासाठी तिघांना तीन प्रकारच्या शिक्षा हे न्यायसंगत नाही.'
राजा त्यांना म्हणाला, 'शिक्षा देताना मी- जशी व्यक्ती तशी शिक्षा -  हेच तत्व समोर ठेवलं होतं. पहिली व्यक्ती अतिशय सज्जन होती. त्याला मी कोणतीही शिक्षा दिली नाही तरी त्यानं घरी गेल्यानंतर आत्महत्या केली. दुसरी व्यक्ती थोड्या जाड चमडीची होती म्हणून तिला मी एक वर्षाची शिक्षा सुनावली.'
एक दरबारी म्हणाला, 'महाराज, तिसर्‍याला मात्र आपण खूपच कठोर शिक्षा दिलीत.'
त्याचं बोलणं ऐकून राजा हसला, म्हणाला, 'कारागृहात जाऊन तुम्ही एकदा त्या व्यक्तीला भेटा. म्हणजे त्याला दिलेल्या शिक्षेचं औचित्य तुमच्या लक्षात येईल.'
काही दरबारी मग त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले. शिक्षा मिळालेल्या आपल्या पूर्व सहकार्‍याला ते भेटले. मिळालेल्या शिक्षेचं त्याच्या चेहर्‍यावर अजिबात वैषम्य नव्हतं. नगरातून धिंड काढल्याचं, कोडे खाल्याचं त्याला  काहीही वाटलं नसावं, कारण तो तिथेही अगदी मजेत होता. भेटायला आलेल्या दरबार्‍यांना तो म्हणाला, 'फक्त वीस वर्षांचीच तर बाब आहे! शिवाय मी इतकं कमावून ठेवलंय की माझ्या सात पिढ्यांनी जरी हात-पाय हालवले नाहीत तरी काही एक कमी पडणार नाही. आणि, या कारागृहातही तसा कुणाचा त्रास नाहीच. आरामात आहे मी अगदी. '
दरबार्‍यांनी विचारलं, 'शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, सगळ्यांसमोर तुम्हाला कोडे मारले गेले, सगळीकडे तुमची बदनामी झाली...'
त्याला मध्येच अडवत ती व्यक्ती म्हणाली,'बदनामी झाली म्हणून काय झालं? शेवटी मला प्रसिद्धीच मिळाली ना? आज शहरभर माझ्याबद्दलच चर्चा करत असतील लोक!'
राजानं योग्य निवाडा केला होता हे दरबार्‍यांना पटलं.
---

Friday, April 27, 2012

राजा भर्तृहरी

-संध्या पेडणेकर
उज्जैनच्या राजा विक्रमादित्याचे सावत्र वडील बंधू राजा भर्तृहरी कवी होते.. श्रृंगार शतक, वैराग्य शतक आणि नीती शतक हे त्यांनी लिहीलेले तीन काव्यग्रंथ. त्यांच्या जीवनाचा पहिला भाग अक्षरशः सर्व प्रकारच्या सुखांचा भोग घेण्यात गेला. भोगाची त्यांनी अती गाठली होती. 
पण अचानक त्यांच्या जीवनाची गाडी वैराग्याच्या वळणार वळली. घोर वैराग्य त्यांनी पत्करलं. त्यामुळे भोग आणि वैराग्याचं उदाहऱण देताना हटकून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तर अशा या भोगात लिप्त असणार्‍या राजाला अचानक विरक्ती कशी झाली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.
राजा भर्तृहरींचा विवाह राजकुमारी पिंगलेशी झाला. नवविवाहितेच्या प्रेमात राजे आकंठ बुडाले. 
त्यादरम्यान दरबारात एका ब्राह्मणानं राजाला आशिर्वादस्वरूप एक फळ दिलं. ते फळ खाणारी व्यक्ती दीर्घायुषी होणार होती. 
राजा भर्तृहरींचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी ते फळ स्वतः खाण्याऐवजी पत्नीला दिलं. 
पण पिंगलेचं प्रेम राजाच्या सारथ्यावर होतं. म्हणून मग, त्याच्या दीर्घायुष्याची कामना मनी बाळगून तिनं ते फळ सारथ्याला दिलं. 
सारथ्याचं एका वेश्येवर प्रेम होतं. दीर्घायुष्य देणारं ते फळ सारथ्यानं त्या वेश्येला दिलं. 
वेश्या चरित्रवान होती. 
तिनं विचार केला, माझं आयुष्य वाढून काय होणार? दीर्घायुष्य खरं तर राजाला लाभायला हवं. तोच प्रजेचं पालन करतो, देशाचं रक्षण करतो. 
ती ते फळ घेऊन दरबारात हजर झाली. फळाच्या गुणाचं वर्णन करून तिनं ते फळ राजाला अर्पण केलं.
राजे मात्र थक्क झाले. त्यांनी ते फळ आपल्या प्रिय राणीला, पिंगलेला दिलं होतं ना!
विचारपूस झाली, उलटतपासण्या झाल्या आणि खरं काय ते सगळ्यांसमोर उघड झालं. 
भर्तृहरीना जीवनाच्या एकूण व्यर्थतेचा साक्षात्कार झाला. आतापर्यंत ज्या ऐशआरामात, ज्या सुखोपभोगात ते लोळत होते त्याची निरर्थकता त्यांना जाणवली. नात्यांचा फोलपणाची त्यांना ओळख पटली.
राजा भर्तृहरीनं मग संन्यास घेतला आणि ते तडक वनात निघून गेले.
घोर श्रृंगारी राजा भर्तृहरी घोर वैरागी बनला. 

Thursday, March 22, 2012

शांती

-संध्या पेडणेकर 
मिथिलेचे राजा नेमी यांनी कधी शास्त्राभ्यास केला नव्हता. किंवा त्यांना आध्यात्मातही रस नव्हता. म्हातारपणी त्यांना घोर दाहक ज्वर झाला. 
थोडा थंडावा मिळावा म्हणून त्यांच्या राण्या त्यांना चंदन आणि केशराचा लेप लावू लागल्या. 
लेप लावताना त्यांच्या हातातील बांगड्या वाजू लागल्या. नेमींना तो आवाज त्रासदायक वाटू लागला. राण्यांना त्यांनी हातातील बांगड्या काढून मगच लेप लावायला सांगितलं. 
बांगड्या म्हणजे सौभाग्याचं लक्षण. राण्यांना पेच पडला, बांगड्या उतरवायच्या कशा? 
पण सम्राटाचं म्हणणं टाळताही येत नव्हतं. 
म्हणून मग त्यांनी सौभाग्याचं निशाण म्हणून एक एक बांगडी हातात ठेवून बाकीच्या बांगड्या उतरवल्या. 
बांगड्यांचा आवाज येणं थांबलं.
सम्राटाचं मन शांत झालं आणि त्यांच्या मनात एक विचार आला - 'हातात दहा-दहा बांगड्या होत्या तेव्हा त्या वाजत होत्या. एक एक राहिली आणि आवाज बंद झाला.'
नेमींना साक्षात्कार झाला. 
अनेक असतील तर गजबजाट अटळ असतो. शांती हवी असेल तर एकच असणं अपरिहार्य आहे.
महाराज नेमी उठून बसले. म्हणाले, 'मला जाऊ द्या.'
राण्यांना भोगी राजा नेमी ठाऊक होते, योगी नेमींना त्या ओळखत नव्हत्या. 
त्यांना वाटलं, तापामुळे महाराज विक्षिप्त झाले. त्या घाबरल्या. 
नेमींना रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 
महाराज नेमींनी त्यांना समजावलं - 'घाबरू नका. मला ज्वर झाल्यानं मी बरळत नाहीय. ही सगळी तुमच्या बांगड्यांची कृपा आहे. ईश्वर कोणत्या माध्यमातून ज्ञान देईल ते सांगता येत नाही. तुम्ही बर्‍याच बांगड्या घातल्या होत्या. आजारपणामुळे त्यातून येणारा कर्कश्श आवाज मला सहन होत नव्हता. एक एक बांगडी उरली आणि तो कर्कश्श आवाज बंद झाला. यावरूनच मला बोध झाला. मनात जोवर बर्‍याच आकांक्षा आहेत तोपर्यंत असा आवाज येतच रहाणार. एकच आकांक्षा असायला हवी- मुक्तीची. वासना अनंत. अभीप्सीत एकच असायला हवं- परमात्याच्या मीलनाचं. 
जागरुकता हवी, संकेत कुठूनही मिळू शकतो. 
---