Showing posts with label दरबारी. Show all posts
Showing posts with label दरबारी. Show all posts

Saturday, September 29, 2012

जैशी व्यक्ती तैशी सजा!

-संध्या पेडणेकर
एका राज्याच्या तीन अधिकार्‍यांनी राज्यकारभारात मोठा घोटाळा केला.
राजानं तिघांनाही बोलावलं.
त्यांच्यापैकी एकाला राजा म्हणाला, 'मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.'
दुसर्‍या व्यक्तीला राजानं एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
तिसर्‍या व्यक्तीला नगरातून धिंड काढून फटके लगावण्याची आणि वीस वर्षे कारावासाची शिक्षा फर्मावली.
दरबारी गोंधळले. एकाच गुन्ह्यासाठी तीन व्यक्तींना तीन प्रकारची शिक्षा?
त्यांनी बिचकत बिचकत राजाला विचारलं, 'एकाच अपराधासाठी तिघांना तीन प्रकारच्या शिक्षा हे न्यायसंगत नाही.'
राजा त्यांना म्हणाला, 'शिक्षा देताना मी- जशी व्यक्ती तशी शिक्षा -  हेच तत्व समोर ठेवलं होतं. पहिली व्यक्ती अतिशय सज्जन होती. त्याला मी कोणतीही शिक्षा दिली नाही तरी त्यानं घरी गेल्यानंतर आत्महत्या केली. दुसरी व्यक्ती थोड्या जाड चमडीची होती म्हणून तिला मी एक वर्षाची शिक्षा सुनावली.'
एक दरबारी म्हणाला, 'महाराज, तिसर्‍याला मात्र आपण खूपच कठोर शिक्षा दिलीत.'
त्याचं बोलणं ऐकून राजा हसला, म्हणाला, 'कारागृहात जाऊन तुम्ही एकदा त्या व्यक्तीला भेटा. म्हणजे त्याला दिलेल्या शिक्षेचं औचित्य तुमच्या लक्षात येईल.'
काही दरबारी मग त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले. शिक्षा मिळालेल्या आपल्या पूर्व सहकार्‍याला ते भेटले. मिळालेल्या शिक्षेचं त्याच्या चेहर्‍यावर अजिबात वैषम्य नव्हतं. नगरातून धिंड काढल्याचं, कोडे खाल्याचं त्याला  काहीही वाटलं नसावं, कारण तो तिथेही अगदी मजेत होता. भेटायला आलेल्या दरबार्‍यांना तो म्हणाला, 'फक्त वीस वर्षांचीच तर बाब आहे! शिवाय मी इतकं कमावून ठेवलंय की माझ्या सात पिढ्यांनी जरी हात-पाय हालवले नाहीत तरी काही एक कमी पडणार नाही. आणि, या कारागृहातही तसा कुणाचा त्रास नाहीच. आरामात आहे मी अगदी. '
दरबार्‍यांनी विचारलं, 'शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, सगळ्यांसमोर तुम्हाला कोडे मारले गेले, सगळीकडे तुमची बदनामी झाली...'
त्याला मध्येच अडवत ती व्यक्ती म्हणाली,'बदनामी झाली म्हणून काय झालं? शेवटी मला प्रसिद्धीच मिळाली ना? आज शहरभर माझ्याबद्दलच चर्चा करत असतील लोक!'
राजानं योग्य निवाडा केला होता हे दरबार्‍यांना पटलं.
---