Showing posts with label नेमी. Show all posts
Showing posts with label नेमी. Show all posts

Thursday, March 22, 2012

शांती

-संध्या पेडणेकर 
मिथिलेचे राजा नेमी यांनी कधी शास्त्राभ्यास केला नव्हता. किंवा त्यांना आध्यात्मातही रस नव्हता. म्हातारपणी त्यांना घोर दाहक ज्वर झाला. 
थोडा थंडावा मिळावा म्हणून त्यांच्या राण्या त्यांना चंदन आणि केशराचा लेप लावू लागल्या. 
लेप लावताना त्यांच्या हातातील बांगड्या वाजू लागल्या. नेमींना तो आवाज त्रासदायक वाटू लागला. राण्यांना त्यांनी हातातील बांगड्या काढून मगच लेप लावायला सांगितलं. 
बांगड्या म्हणजे सौभाग्याचं लक्षण. राण्यांना पेच पडला, बांगड्या उतरवायच्या कशा? 
पण सम्राटाचं म्हणणं टाळताही येत नव्हतं. 
म्हणून मग त्यांनी सौभाग्याचं निशाण म्हणून एक एक बांगडी हातात ठेवून बाकीच्या बांगड्या उतरवल्या. 
बांगड्यांचा आवाज येणं थांबलं.
सम्राटाचं मन शांत झालं आणि त्यांच्या मनात एक विचार आला - 'हातात दहा-दहा बांगड्या होत्या तेव्हा त्या वाजत होत्या. एक एक राहिली आणि आवाज बंद झाला.'
नेमींना साक्षात्कार झाला. 
अनेक असतील तर गजबजाट अटळ असतो. शांती हवी असेल तर एकच असणं अपरिहार्य आहे.
महाराज नेमी उठून बसले. म्हणाले, 'मला जाऊ द्या.'
राण्यांना भोगी राजा नेमी ठाऊक होते, योगी नेमींना त्या ओळखत नव्हत्या. 
त्यांना वाटलं, तापामुळे महाराज विक्षिप्त झाले. त्या घाबरल्या. 
नेमींना रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 
महाराज नेमींनी त्यांना समजावलं - 'घाबरू नका. मला ज्वर झाल्यानं मी बरळत नाहीय. ही सगळी तुमच्या बांगड्यांची कृपा आहे. ईश्वर कोणत्या माध्यमातून ज्ञान देईल ते सांगता येत नाही. तुम्ही बर्‍याच बांगड्या घातल्या होत्या. आजारपणामुळे त्यातून येणारा कर्कश्श आवाज मला सहन होत नव्हता. एक एक बांगडी उरली आणि तो कर्कश्श आवाज बंद झाला. यावरूनच मला बोध झाला. मनात जोवर बर्‍याच आकांक्षा आहेत तोपर्यंत असा आवाज येतच रहाणार. एकच आकांक्षा असायला हवी- मुक्तीची. वासना अनंत. अभीप्सीत एकच असायला हवं- परमात्याच्या मीलनाचं. 
जागरुकता हवी, संकेत कुठूनही मिळू शकतो. 
---