Showing posts with label Sage. Show all posts
Showing posts with label Sage. Show all posts

Friday, October 19, 2012

वैराग्यातील उणीव

-संध्या पेडणेकर
पुराणात राजा भर्तृहरींबद्दल एक कथा आहे. त्यांना वैराग्य आलं तेव्हा त्यांनी आपल्या राज्याचा त्याग केला. त्यावेळी पार्वतीने शंकरासमोर त्यांच्या त्यागाची वाखाणणी केली. पण शंकर म्हणाले, 'त्यांच्या त्यागात उणीवा आहेत.'
पार्वतीनं विचारलं, 'कोणत्या उणीवा?'
शंकर म्हणाले, 'भर्तृहरीनं राज्याचा त्याग भले केला असेल, पण संन्याशाच्या जीवनाची सुरवात करताना त्यांनी काही वस्तू सोबत घेतल्या. राजमहालातून निघताना त्यांनी पाण्याचं भांडं, उशी आणि हवा ढाळण्यासाठी पंखा सोबत घेतला.' यावर पार्वती निरुत्तर झाली.
काही काळानंतर साधनेच्या क्रमात वैराग्याची खोली वाढत गेली हळूहळू या तिन्ही वस्तूंची त्यांना असलेली गरज संपली.  पार्वतीने त्यांच्या वैराग्याबद्दल विचारलं तेव्हाही शंकर म्हणाले, 'अजूनही उणीव आहे.'
पार्वतीनं विचारलं, 'आता कुठली उणीव आहे? वैराग्याबद्दलचे आपले अनुभव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते वैराग्यशतक लिहिताहेत, भिक्षा मागणंही त्यांनी सोडून दिलंय. मिळालं तर खातात, नाही मिळालं तर काही खातही नाहीत.  बराच काळपर्यंत खायला काही मिळालं नाही तर पिंडदानासाठी आलेल्या पिठाच्या भाकर्‍या थापून त्या चितेच्या आगीवर भाजून खातात. अजून त्यांच्या वैराग्यात उणीव आहे असं म्हणता तर ती कोणती ते सांगा.'
ही गोष्ट सांगून समजण्यासारखी नाही हे शंकराच्या लक्षात आलं होतं. ते म्हणाले, चला आपण प्रत्यक्षच पाहू. मग दोघेही वेष पालटून भर्तृहरीसमोर आले. शंकरानं वृद्धाचा आणि पार्वतीनं वृद्धेचा वेष घेतला होता. त्यांनी भर्तृहरीकडे भिक्षा मागितली.
भर्तृहरींना गेले तीन दिवस भिक्षा मिळाली नव्हती. त्यादिवशी त्यांना थोडं पीठ मिळालं होतं त्याच्या भाकर्‍या ते भाजत होते. त्यांनी या वृद्ध जोडप्याला बसवलं आणि सार्‍या भाकर्‍या त्यांना दिल्या.
यावर त्यांच्या वैराग्याच्या पूर्ततेबद्दल पार्वतीने नजरेनंच शंकराला विचारलं.
त्यावर शंकर नजरेनंच उत्तरले, 'नाही'.
वृद्ध दांपत्यामध्ये चाललेली नजरेच्या खुणांची देवघेव भर्तृहरींच्या नजरेतून निसटली नव्हती. त्यांनी कुतूहलानं विचारलं तेव्हा पार्वतीनं केलेल्या पृच्छेबद्दल सांगताना शंकर म्हणाले, 'या विचारताहेत की,  यानं सगळ्या भाकर्‍या आपल्याला दिल्या. आता हा काय खाणार? आपण याला काही भाकर्‍या देऊया.'
ते ऐकलं आणि भर्तृहरींचा अहंकार डिवचला गेला. ते म्हणाले, 'आपण मला ओळखत नाही. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा मोह बाळगला नाही तर या चार भाकर्‍यांचा मोह  मी काय बाळगणार? न्या सगळ्या भाकर्‍या, आणि अगदी शांत चित्तानं आपली भूक भागवा. यातच माझा संतोष सामावलेला आहे.'
शंकर काही बोलणार त्याआधी पार्वती म्हणाली, 'आलं माझ्या लक्षात. भर्तृहरीनं लौकीक वस्तूंचा त्याग केला पण त्यांच्या मनात अजूनही यशाची आसक्ती आणि अहंकार ठाण मांडून आहेत. भगवन्, बरोबर आहे आपलं, यांच्या वैराग्यात उणीवा आहेत.'
---