Showing posts with label स्वप्न. Show all posts
Showing posts with label स्वप्न. Show all posts

Saturday, May 5, 2012

स्वप्न, सत्य आणि न्याय

-संध्या पेडणेकर
चोमा नावाचा एक लाकूडफोड्या होता. एकदा लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला असता एक भयभीत हरण अचानक त्याच्यासमोर आलं. ते इतकं भेदरलेलं होतं की त्याची शिकार करण्यासाठी चोमाला फार कष्ट पडले नाहीत.
पण मग एक समस्या आली. लाकडांचा भारा आणि हरण एकदम नेणं चोमाला जमणार नव्हतं. थोडा वेळ विचार करून चोमानं ठरवलं की एरवीही हरणाकडे  लक्ष द्यायला आपल्याकडे संध्याकाळपर्यंत वेळ नाही, तेव्हा - आधी आपण बाजारात नेऊन  लाकडं विकू, मिळणार्‍या पैशांतून खरेदी आटोपून, खरेदी केलेल्या वस्तू घरी ठेवू आणि मग सावकाश येऊन हरण घरी नेऊ.
त्यानं मग पटपट एक खड्डा खोदला आणि त्यात हरण पुरलं.
ठरल्याप्रमाणे सगळी कामं आटोपून तो जेव्हा पुन्हा जंगलात आला तेव्हा मात्र त्याला त्यानं पुरलेलं हरण मिळालं नाही.
बरीच शोधाशोध केल्यानंतर आपण शिकार खरंच केली होती का, असा संशय चोमाच्या मनात निर्माण झाला. थोड्या वेळानं संशय पक्का झाला आणि हरण मिळालं नाही तेव्हा तो घरी परतला.
संध्याकाळच्या वेळी मित्र भेटले तेव्हा त्यानं त्या सगळ्यांसमोर आपल्याला झालेल्या भासाची गोष्ट सांगितली.
चोमाचा एक मित्र होता चानी. इतरांनी चोमानं सांगितलं ते खरं मानलं तरी चानीला मात्र चोमा जे सांगत होता ते पटलं नाही. त्याला वाटलं, चोमानं खरंच शिकार केली असावी आणि जमिनीत पुरलेलं हरण त्याला मिळालं नसावं.
रात्री चानी जंगलात गेला आणि त्यानं थोडी शोधोध केल्यावर त्याला चोमानं पुरलेलं हरण मिळालं.
घरी आणून त्यानं हरणाच्या मांसाचे तुकडे केले, त्याचं मांस आणि कातडं विकून चानीनं बक्कळ पैसा कमावला.
चोमाला जेव्हा हे समजलं तेव्हा तो चानीच्या घरी आला आणि त्यानं त्याच्याकडे आपला पैसा मागितला. हरणाची शिकार आपण केलेली असल्यानं त्या पैशांवर आपला अधिकार असल्याचं त्याचं म्हणणं होतं.
पण चानी त्याचं म्हणणं मान्य करायला तयार नव्हता.
त्याचं म्हणणं की, चोमानं प्रत्यक्षात शिकार केलीच नाही, शिकारीचं त्यानं फक्त स्वप्न पाहिलं. म्हणून हरणापासून मिळालेल्या पैशांवर त्याचा काहीही अधिकार नाही.
चोमानं गावच्या पंचायतीत तक्रार केली. पंचायत निवाडा करण्यासाठी बसली. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पंचांनी न्याय दिला,
"चोमानं शिकार केली पण आपण केलेल्या शिकारीला स्वप्न समजण्याची चूकही त्याच्याकडून झाली. हरणाच्या शिकारीचं स्वप्नच जर चोमानं पाहिलं होतं तर मग हरणाचं मांस आणि चामडं विकून मिळणार्‍या पैशांत त्याचा वाटा नाही. सत्य आणि स्वप्न यात गफलत केली चोमानं.
चानी हा चोमाचा मित्र. खरं तर त्यानं चोमाला त्याची चूक दाखवून देऊन हरण शोधण्यास मदत करावयास हवी होती, परंतु लोभापोटी त्यानं तसं न करता स्वतः हरण शोधून काढून ते परस्पर विकून पैसे गाठीला बांधले. ही चानीची चूक.
अशारीतीने, दोघांचीही चूक असल्याकारणानं हरणामुळे मिळालेल्या पैशांवर आता दोघांचाही हक्क रहाणार नाही. चानीने ते धन आणून पंचांच्या सुपूर्द करावं."
अशा रीतीनं चोमाच्या भाबडेपणामुळे आणि चानीच्या बेरकीपणामुळे त्या दोघांचंही नुकसान झालं.