Showing posts with label श्वेतकेतु. Show all posts
Showing posts with label श्वेतकेतु. Show all posts

Wednesday, August 8, 2012

तत्वमसि श्वेतकेतु

-संध्या पेडणेकर
बरीच वर्षे विद्यार्जन केल्यानंतर श्वेतकेतु घरी परतला. वडिलांनी त्याला विचारलं, 'विद्यार्जन पूर्ण झालं म्हणतोस तर मग ब्रह्मज्ञान मिळवलंस का? कारण त्याविना इतर सर्व विद्या व्यर्थच.'
श्वेतकेतु वडिलांना म्हणाला, 'माझ्या गुरुदेवांना जर त्याबद्दल माहिती असती तर त्यांनी मला अवश्य ब्रह्मज्ञान दिलं असतं. कारण ज्या ज्या विद्या त्यांना अवगत होत्या त्या सर्व त्यांनी मला दिल्या. ते स्वतः मला म्हणाले की, श्वेतकेतु, तुला शिकवण्यासारखं माझ्यापाशी आता काहीही शिल्लक राहिलं नाही. आता तू स्वगृही परतू शकतोस.'
श्वेतकेतूचं म्हणणं ऐकल्यावर उद्दालक - श्वेतकेतुचे वडील - त्याला म्हणाले, 'म्हणजे ही विद्या शिकवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली म्हणायची. ठीक आहे, बाहेर जा आणि एक फळ तोडून आण झाडावरून.'
श्वेतकेतु झाडावरून फळ तोडून घेऊन आला.
वडील त्याला म्हणाले, 'काप ते फळ.'
श्वेतकेतूनं फळ कापलं. फळात खूप बिया होत्या.
वडील त्याला म्हणाले, 'यातील एक बीज निवड.'
श्वेतकेतूनं बीज निवडलं तेव्हा वडिलांनी त्याला विचारलं, 'एवढ्याश्या बीजातून प्रचंड वृक्ष बनू शकेल का?'
श्वेतकेतु म्हणाला, 'हो तर, बीजातूनच वृक्षाचा जन्म होतो.'
वडील त्याला म्हणाले, 'म्हणजे, यातच वृक्ष लपलेला असायला हवा. तू ते बीज चीर. त्यात लपलेला वृक्ष आपण शोधून काढू.'
श्वेतकेतूनं बीज कापलं पण त्यात काहीही नव्हतं. तिथे केवळ शून्य होतं. श्वेतकेतू वडिलांना म्हणाला, 'यात तर काहीही नाहीय.'
उद्दालक त्याला म्हणाले, 'जे दिसत नाही, जे अदृश्य आहे त्यातूनच एक विशाल वृक्ष निर्माण होतो. आपणही अशाच शून्यातून जन्माला आलो.'
यावर श्वेतकेतूनं विचारलं, 'म्हणजे, मीसुद्धा त्या महाशून्यातूनच जन्माला आलो का?'
श्वेतकेतूच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याचे वडील उद्दालक त्याला म्हणाले, 'तत्वमसि श्वेतकेतु - होय श्वेतकेतु, तू सुद्धा याच महाशून्यातून आला आहेस.तू त्याचाच एक भाग आहेस.'
वडिलांचं ते वाक्य  ऐकलं आणि श्वेतकेतूला ज्ञानप्राप्ती झाली असं म्हणतात.