Showing posts with label यशोधरा. Show all posts
Showing posts with label यशोधरा. Show all posts

Friday, July 6, 2012

दान काय देणार?

-संध्या पेडणेकर
ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध घरी परतले. अकरा वर्षांनंतर ते घरी परतले होते. त्यांनी घर सोडलं त्यावेळी त्यांचा मुलगा राहुल एक वर्षाचा होता. ते परतले तेव्हा तो बारा वर्षांचा झाला होता.
यशोधरा - गौतम बुद्धांची पत्नी - त्यांच्यावर खूप रागावलेली होती. गौतम बुद्धांवर नजर पडताच तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली - 'एवढासुद्धा भरंवसा वाटला नाही का तुम्हाला माझ्याबद्दल? 'मी चाललो', असं जर मला म्हटलं असतंत तर मी तुम्हाला रोखून ठेवेन असं तुम्हाला वाटलं होतं का? मी क्षत्राणी आहे हे तुम्ही कदाचित विसरला होतात तेव्हा. आम्ही जर पतीला टिळा लावून रणांगणावर पाठवू शकतो तर तुम्हाला सत्याचा शोध घेण्यासाठी पाठवू शकले नसते का मी? तुम्ही माझा अपमान केला.'
कित्येक लोकांनी बुद्धांना बर्‍याच प्रकारचे प्रश्न विचारले होते पण यशोधरेच्या प्रश्नांनी  बुद्धांना निरुत्तर केलं.
पुढे यशोधरेनं बुद्धांना विचारलं, 'जंगलात जाऊन तुम्ही जे मिळवलं ते तुम्हाला इथे राहून मिळालं नसतं का?' याचं उत्तरही बुद्ध होकारार्थी देऊ शकले नाहीत कारण सत्य तर सर्व ठिकाणी विद्यमान असतं.
पण यशोधरेनं त्यानंतर जे केलं ते वर्मी घाव घालणारं होता. यशोधरेनं आपल्या मुलाला - राहुलला पुढे केलं आणि ती त्याला म्हणाली, 'पाहा, हे समोर हातात भिक्षापात्र घेऊन जे उभे आहेत ना, तेच तुझे वडील आहेत. तू एक दिवसाचा होतास तेव्हा हे तुला सोडून पळून गेले होते. त्यानंतर हे आत्ता परतले. आता जातील तेव्हा देव जाणे पुन्हा कधी भेट होईल. तू त्यांच्याकडून आपला वारसा मागून घे. तुला देण्यासाठी यांच्याजवळ जे काय आहे ते मागून घे.'
बुद्धांजवळ त्याला देण्यासाठी काय असणार? यशोधरा सूड उगवून घेत होती, मनात साठलेला राग शब्दांवाटे व्यक्त करत होती. आपण विचारलेल्या प्रश्नामुळे परिस्थितीला अचानक वेगळी कलाटणी मिळेल याची 
तिला अजिबात कल्पना नव्हती.
तिचं बोलणं संपतं न संपतं तो बुद्धांनी आपलं भिक्षापात्र राहुलला दिलं. ते म्हणाले, 'बेटा, मला जे मिळालं ते मी तुला देतो. या व्यतिरिक्त तुला देण्याजोगं माझ्याजवळ काहीही नाही. तू संन्यासी हो!' 

ऐकलं आणि यशोधरेच्या डोळ्यांना आसवांची धार लागली.
बुद्ध म्हणाले, 'समाधीच माझी संपदा आहे. संन्यास घेण्यानंच ती वाटता येते. खरं तर, तुलाही घेऊन जावं म्हणूनच मी आलो होतो. ज्या संपदेचा मी धनी झालो तिची 
तू ही धनी व्हावंस असं मला वाटतं.'
राहूलने पित्याची इच्छा पूर्ण केली
आपण क्षत्राणी आहेत हे यशोधरेनंही सिद्ध करून दाखवलं. बुद्धांकडून दीक्षा घेऊन ती सुद्धा भिक्षुंमध्ये मिसळून गेली. इतकी, की त्यानंतर बौद्ध शास्त्रांमध्ये तिचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही.