Showing posts with label द्रौपदी. Show all posts
Showing posts with label द्रौपदी. Show all posts

Friday, June 1, 2012

क्षमा

-संध्या पेडणेकर 
कुरुक्षेत्रावर घडलेल्या युद्धानंतरच्या रात्री अश्वत्थाम्याने पांडवांच्या शिबिरास आग लावली. आगीपासून प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांचा त्याने बाण मारून वध केला. महाभारताच्या युद्धातून पांडवपक्षाचं जे काही सैन्यबळ वाचलं होतं त्याचा पार धुव्वा उडाला आणि पांडव वंशापैकी त्यावेळी जे कुणी शिबिरात होते ते सुद्धा मारले गेले. 
युद्धात विजय मिळाल्यानंतर पाच पांडव आणि सात्यकी यांना घेऊन कृष्ण इतर ठिकाणी गेला होता त्यामुळे ते तेवढे वाचले. पांडवांच्या सैन्यात आता एवढेच लोक उरले होते.
सकाळी जेव्हा ते शिबिरात परतले तेव्हा तिथे त्यांना अर्धवट जळालेल्या प्रेतांचा खच पडलेला दिसला. 
महाराणी द्रौपदीच्या पाचही पुत्रांचे क्षतविक्षत मृतदेह तेथे पडलेले होते. द्रौपदीच्या व्यथेचं वर्णन काय सांगावं....
अर्जुनानं द्रौपदीला धीर दिला. तो म्हणाला, यांच्या मारणार्‍या नराधमाचं - त्या अश्वत्थाम्याचं धडावेगळं शीर पाहिल्यानंतरच तू आज स्नान कर.'
आपल्या रथात बसून श्रीकृष्णाबरोबर अर्जुन अश्वत्थाम्याला शोधण्यासाठी निघून गेला.
अश्वत्थ्याम्यानं अर्जुनाला पाहिलं तेव्हा तो प्राणभयानं पळू लागला. पण अर्जुनानं त्याचा पाठलाग केला आणि त्याला बंदी बनवलं. त्यानं अश्वत्थाम्याला द्रौपदीसमोर आणून उभं केलं.
अश्वत्थाम्यावर नजर पडताच भीम म्हणाला, 'तात्काळ याला ठार मारलं पाहिजे.'
सगळ्यांचाच राग उफाळलेला होता.
पण द्रौपदीनं सगळ्यांना सबूरीनं घेण्यास सांगितलं. द्रौपदी म्हणाली, 'माझे पुत्र मारले गेले त्यामुळे पुत्रशोक म्हणजे काय हे मी चांगलं जाणते. याची माता कृपी आपल्या गुरुपत्नी आहेत. माझ्यासारखं पुत्रवियोगाचं दुःख त्याना सहन करावं लागू नये असं मला वाटतं. आपल्याला उत्तम शस्त्रविद्या देणार्‍या गुरु द्रोणांचं त्यांच्या या पुत्रात आम्हाला दर्शन होतं. याच्याशी निष्ठूरपणानं वागणं आपल्याला शक्य नाही. सोडून द्या, जाऊ दे याला.'
जिच्या पाच मुलांची प्रेतं समोर पडलेली असताना आणि त्यांचा वध करणारा समोर बंदी होऊन उभा असताना द्रौपदीनं  त्याला केलेली क्षमा खरोखर धन्य होय.
---

Wednesday, February 22, 2012

द्रौपदीला हसू का आलं?

-संध्या पेडणेकरमहाभारताचं युद्ध संपल्यानंतरची ही कथा आहे.
धर्मराज युधिष्ठिर एकछत्री सम्राट झाले.  युद्धभूमीतील शरशय्येवर पडून भीष्म सूर्याच्या उत्तरायणात प्रवेश करण्याची वाट पाहात होते. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिर, द्रौपदी आणि आपल्या भावांसह पितामह भीष्मांकडून उपदेश ग्रहण करण्यासाठी युद्धभूमीवर आले होते. युधिष्ठिरांनी पितामहांना वर्णाश्रम, राजा-प्रजा, धर्म इ. बद्दल प्रश्न विचारले.
भीष्म युधिष्ठिराला धर्माबद्दल उपदेश देत होते तेव्हा द्रौपदीला अचानक हसू आलं. तेव्हा पितामह भीष्म यांनी द्रौपदीला विचारलं, 'पोरी, तू का हसलीस?'
 द्रौपदी संकोचून म्हणाली, 'चूक झाली पितामह, क्षमा करा.'
द्रौपदीच्या क्षमा मागण्यानं भीष्मांचं समाधान झालं नाही. ते द्रौपदीला म्हणाले, 'तुझ्या हसण्यामागे काहीतरी कारण आहे हे निश्चित. संकोचू नको, स्पष्ट सांग.'
द्रौपदीनं हात जोडून भीष्मांना वंदन केलं. म्हणाली, 'आपला आग्रह मी टाळू शकत नाही. आपण धर्मोपदेश देत होता तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. वाटलं, आज आपण धर्माची उत्तम व्याख्या करता. धर्म समजावून सांगताय. पण दुर्योधनाच्या सभेत जेव्हा दुःशासन मला निर्वस्त्र करत होता तेव्हा धर्माबद्दलचं हे तुमचं ज्ञान कुठे गेलं होतं? हा विचार मनात आला आणि मला हसू आलं. क्षमा करा मला.'
द्रौपदीचं बोलणं ऐकून भीष्म म्हणाले, 'यात क्षमा मागण्यासारखं काहीही नाही. त्यावेळीसुद्धा माझ्याजवळ धर्माचं ज्ञान होतं. पण अन्यायी दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धि कुंद पडली होती. म्हणूनच त्यावेळी मी योग्य निर्णय करू शकलो नाही. अर्जुनाचा बाण लागला आणि माझ्या शरीरातील सगळं दूषित रक्त वाहून गेलं. बुद्धी झळझळीत शुद्ध झाली. धर्माचं योग्य विवेचन करणं त्यामुळेच मला शक्य होत आहे.'
---